मुंबई -एप्रिल ते जून या कालावधीत भारताने 76 टन सोन्याची आयात केली आहे. गेल्या वर्षाच्या या कालावधीच्या तुलनेत ही आयात 19 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती जागतिक सुवर्ण परिषदेने दिली आहे.
गेल्या वर्षी या काळात भारताने केवळ 63 टन सोन्याची आयात केली होती. यापेक्षा जास्त प्रमाणात सोन्याची आयात झाली असती मात्र या काळामध्ये करोनाची दुसरी लाट आल्यामुळे या मागणीवर परिणाम झाला असल्याचे दिसून येते.
जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या काळामध्ये भारतातील सोन्याची आयात 157 टन इतकी झाली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी आर यांनी सांगितले की,
आगामी काळामध्ये परिस्थिती सुधारणार आहे. त्यामुळे दागिन्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी भारतातील सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याबरोबरच डिजिटल सोने खरेदी करण्याची पद्धत ग्राहक स्वीकारत आहेत. आगामी काळामध्ये बरेच सण येणार आहेत.
त्याचबरोबर चौथ्या तिमाहीमध्ये लग्नाचे मुहूर्त येणार आहेत. त्यामुळे या काळात सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.