तलम रेशमी किंवा पातळ मलमलच्या कापडावर सोन्या चांदीच्या बारीक तारा आणि स्प्रिंग्जनी केलेली भरगच्च पानाफुलांची आणि वेलबुट्टीची नक्षी पाहिली की कुणाचंही मन वेडावून जाईल. या जरदोझी किंवा आरीकामाच्या नक्षीला फक्त भारतातूनच नाही तर परदेशातूनही प्रचंड मागणी असते. अर्थात जरदोझी आणि आरीकाम हे आपल्याकडेही इतकं प्रसिध्द आहे की जास्तीतजास्त बायकांकडे या प्रकारचं भरतकाम केलेली किमान एकतरी साडी किंवा घागरा असतोच.
“जरदोझी’ या शब्दाचा उगम पारशी “जर’ म्हणजे सोनं आणि “दोझी’ म्हणजे भरतकाम या दोन शब्दांवरून आली आहे. धातूच्या तारा वापरून केलेल्या भरतकामाचा उगम पर्शियातून झाला असला तरी भारतातही अशा प्रकारचं भरतकाम वैदिक काळाच्या दरम्यान अस्तित्वात होतं असे उल्लेख आढळतात. अजिंठ्याच्या लेण्यांमध्येही जरदोझी काम केलेली वस्त्रं भित्तिचित्रांमध्ये आढळतात.
जरदोझीच्या अगदी जवळचं भरतकाम म्हणजे भारतातल्या बाराबंकी भागात उगम पावलेलं आरीकाम. जरदोझी आणि आरीकामात फरक इतकाच आहे की जरदोझीमध्ये धातूच्या तारेच्या लहान लहान स्प्रिंग्ज वापरलेल्या असतात आणि आरीकामात दोरा जास्त वापरलेला असतो. जरदोझी कामात सुई कपड्यावरून आडवी फिरते तर आरीकामात ती उभी फिरते. आरीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सुईच्या टोकाला हुक असतं. ही सुई कपड्याच्या आत बाहेर करून विणकाम केलं जातं.
जरदोझी आणि आरीकाम केलेली वस्त्रं पूर्वी राजवाड्यातल्या भिंती, राजाच्या प्रवासाचे तंबू आणि हत्ती, घोड्यांची झूल अशा प्रकारच्या कपड्यांसाठी वापरली जायची. नंतर अकबर आणि औरंगजेबाच्या काळात राजघराण्यातल्या स्त्रिया आणि पुरुषही जरदोझी आणि आरीकाम केलेली वस्त्रं वापरत होते. पण आठराव्या आणि एकोणिसाव्या शतकापासून जवळपास फक्त स्त्रियांची वस्त्रंच जरदोझी आणि आरीकामाच्या भरतकामातून सजवली जातात.
कापडावर जरदोझी काम करण्यापूर्वी दोन तीन पायऱ्या असतात. कापडावर जी नक्षी काढायची आहे ती कागदावर ट्रेस केलेली असते. त्या कागदावर मग त्या नक्षीनुसार बारीक बारिक छिद्रं पाडली जातात. मग रेशमी साडीवर किंवा ज्या कापडावर ही नक्षी काढायची आहे ते कापड एका मोठ्या लाकडी पलंगासारख्या खाचेवर ताणून बसवतात. त्यावर मग या नक्षीचे छिद्रं असलेला कागद ठेवतात आणि त्यावरून निळ आणि रॉकेलच्या मिश्रणात बुडवलेला बोळा फिरवतात. कागदाला असलेल्या छिद्रातून हे मिश्रण खाली कापडावर उमटतं. मग या कापडावर जरदोझी किंवा अरीकाम केलं जातं. अतिशय सुक्ष्म अशी ही धातूच्या तारा, मणी, मोती आणि स्प्रिंग्ज वापरून केलेली नक्षी एखाद्या साडीवर विणायला आठ-दहा लोकांना दररोज अठरा तास खपून पूर्ण करायला पाच ते सहा दिवस लागतात.
आपण लखनौ, बाराबंकी किंवा उत्तरप्रदेशच्या जरदोझी आणि आरीकाम करणाऱ्या घराच्या गल्ल्यांमधून फिरलो तर आपल्याला घराघरात एका चौकटीभोवती बसून मान मोडून सुई-दोऱ्याचं बारीक विणकाम करणारे लोक दिसतील. ते करत असलेलं काम जितकं उच्च प्रतीचं आणि मनोहारी असतं तितक्याच या जरदोजांच्या जीवनातल्या समस्यांना ठिगळ लावण्याइतकीही सुबत्ता कुठे दिसत नाही.
एक तर भरतकामाचं हे काम इतकं कौशल्याचं असतं की ते पूर्ण शिकायलाच पंचवीस वर्षंही लागू शकतात. त्यामुळे याचं शिक्षण घरातल्या लहान मुलांना वयाच्या सहा सात वर्षांपासूनच दिलं जातं. त्यामुळे त्यांनी पुढे शाळा शिकायचा प्रश्नच येत नाही. हे काम करणारी बहुसंख्य कुटुंबं दिवसभर बारा-पंधरा तास काम करूनही प्रत्येकाला शंभर ते दोनशे रुपये रोजंदारी मिळते. हे तयार करत असलेलं काम पुढे स्थानिक दलाल आणि दुकानदार किमान दहा-वीस पट नफा कमवूनच विकतात. त्यातून फक्त रोजच्या मिठ-भाकरीचा प्रश्न सुटू शकतो पण त्यामुळे यांना बाराही महिने, आठवड्याचे सातही दिवस रोज काम करावंच लागतं तरच हाता-तोंडाशी गाठ पडते. सरकार ज्या काही तोकड्या योजना या असंघटित कामगारांसाठी निर्माण करतं त्यांची माहिती यांच्यापर्यंत एक तर पोहोचत नाही किंवा पोहोचलीच तर मधले एनजीओचे लोकच त्याचा फायदा घेतात आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत एक दमडाही पोहोचत नाही. यात आपल्याला काय करता येईल हे आज तरी आपल्या हातात नाही. खरंतर जरदोझी काय किंवा इतर कोणती हस्तकला काय, आपल्याकडे इतिहास सगळीकडेच भरजरी आहे पण वर्तमान फाटका आहे हेच खरं!
अमृता देशपांडे