मानव जगात जे कर्म करतो ते नेमके कशासाठी? त्यातून त्याला काय साध्य करायचे असते? मनाला समाधान, आनंद प्राप्त होण्यासाठीच का हे सर्व चालले आहे? याचे उत्तर शोधायला गेलात तर समजेल की, मानव आयुष्यात आनंद व समाधान मिळण्यासाठी सर्व कर्मे करीत आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन काही जणांना अज्ञात शक्तीचा ध्यास लागलेला दिसतो, कुणी निरंकार ईश्वराला मानतो तर कुणी नीतितत्त्वांना प्रमाण मानून आचरण करतो. मानवात अशा विविध प्रकृती आहेत. मानवाचे आयुष्य असे किती वर्षांचे असते? जेमतेम 70-80 वर्षांचे मानू या. एवढ्या कमी कालावधीत मानव आपला अमूल्य वेळ इतर गोष्टींत वाया घालवतो. काहीजण तर आपण कशासाठी जगत आहोत, आपल्याला आयुष्यात काय प्राप्त करायचे आहे, याचा गंभीरपणे मानव विचार करताना दिसत नाही. चांगले वागणे, बोलणे, कर्म करणे यावर मानवाने नीट विचार केला पाहिजे, तरच मानवाचे जीवन सफल होईल.
स्वामी विवेकानंद हे जगातील आदर्श व्यक्तिमत्त्व. हिंदू धर्माचे खरे तत्त्वज्ञान त्यांनी जाणले. कुशाग्र बुद्धी, अफाट ज्ञानशक्ती यांचे ते भांडार होते. अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेत त्यांनी सर्वांना संबोधित करताना म्हटले होते की, वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग सरळ असो की वाकडे-तिकडे, ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात. सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेने पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकले आहे. या साऱ्यांनी पृथ्वीवर हिंसाचार होऊन कितीतरी संस्कृतींचा नाश झाला आणि कितीतरी लोक गिळून टाकले. हे राक्षस नसते तर मानवसमाज आज कितीतरी विकसित झाला असता.
स्वामी विवेकानंद यांना धर्माच्या नावावर हिंसाचार करणे मान्य नव्हते. मानवाने नीतिमत्तेचे पालन केले तर त्याला कर्मकांड करण्याची गरज नाही, अशी त्यांची विचारधारा होती. याचाच अर्थ असा की, मानवाने नीती सोडू नये. आपल्या आणि दुसऱ्यांच्या हृदयातील देव पाहायला शिका, असे विवेकानंद म्हणत असत. अपंग, गरीब, अज्ञानी यांची मानव म्हणून उन्नती करणे, त्यांना मानव म्हणून जगण्यास पात्र करणे, हे जगातील मानवधर्माचे मोठे कार्य आहे.
समाजासाठी काहीतरी करावे, निराधाराला आधार द्यावा, दुर्बलांना सबल करावे, हेच मानव जन्माचे कर्तव्य आहे. यातच ईश्वर सामावलेला आहे. सकारात्मक कार्यासाठी कोणतेही मनापासून केलेले कर्म मानवाला याही देही मोक्ष मिळवून देईल. आपण जगावे आणि जगाला मदत करावी, हे मानवाचे धोरण असले पाहिजे. तरच मानव जन्म सार्थकी लागेल.
– अशोक सुतार