भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन्ही कसोटीत फिरकीच्या तालावर नाचवले व तेच चित्र ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत भारताच्या बाबतीत घडवले. मुळातच भारतीय खेळपट्टीवर बॅकफूटवर जात फटके मारणे हीच चूक होती. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांचे बाद होणे पाहिले तर हेच लक्षात येते.
वेगवान गोलंदाजांचा सामना करताना किंवा षटके खेळून काढण्यासाठी बॅकफूटवर जाऊन प्लेड केले जाते. मात्र, हेच लॉजिक फिरकी गोलंदाजांसमोर कुचकामी ठरते. बॅकफूटवर जाऊन खेळताना वेळ जास्त मिळतो हे खरे असले तरीही तोपर्यंत चेंडूने फिरकी घेतलेली असते व कोणता फटका खेळायचा याचा चॉईस फलंदाजाला राहात नाही. रोहित व कोहली याच प्रयत्नात बाद झाले. खरेतर हे दोघे जागतिक कीर्तिचे फलंदाज असूनही इतके वाईट पद्धतीने पूल किंवा स्वीप का करतात, हेच आता समजेनासे झाले आहे.
नाथन लियॉन, मॅथ्यू कुन्हेमन व टॉड मर्फी यांनी या कसोटी मालिकेत ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे तो दर्जा आजवर भारताचे दौरे केलेल्या शेन वॉर्नच्या गोलंदाजीतही कधी दिसला नव्हता. खेळपट्टीचा पुरेपूर वापर करत पॉपिंग क्रीझच्या मागेच पाय लॅण्ड करत या तिघांनी केलेली गोलंदाजी भारताच्या कसलेल्या फलंदाजांनाही उमगली नाही.
कोहली ज्या चेंडूवर बाद झाला ते पाहून यालाच आता पुन्हा एकदा क्रिकेटचे तंत्र घोटायला लावले पाहिजे असे वाटले. रोहितबद्दल काय बोलणार, त्याचा तो जुना टच कुठेतरी हरवला आहे. केवळ कर्णधार आहे म्हणून संघात टिकला आहे, हे तर उघड आहे.
पहिल्या डावात कुन्हेमनने तर दुसऱ्या डावात लियॉनने भारताच्या भक्कम फलंदाजीला भगदाड पाडले. हे फलंदाज बाद झाले ते चेंडू काही अनप्लेएबल निश्चितच नव्हते, परंतु टी-20 क्रिकेटच्या मुशीत वाढलेल्यांना कसोटीत कशी फलंदाजी करायची असते हेच समजत नाही, याला आपण किंवा ते तरी काय करणार.
महंमद शमीला वगळून उमेश यादवला का खेळवले गेले, हा प्रश्न होता. त्याने तीन बळी घेतले, मात्र तरीही शमीलाच खेळवायला हवे होते. सुरुवातीला खेळपट्टीवरचे दव तर संध्याकाळी रिव्हर्स स्विंग त्याला निश्चितच मिळाला असता. असो, मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड संघाबरोबर आहेच, पण आता ही कसोटी संपल्यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व व्हीव्हीएस लक्ष्मण यांना भारतीय संघाच्या नेटमध्ये बोलावले पाहिजे व पंचाच्या जागी उभे राहून रोहित व कोहलीसह सगळ्या फलंदाजांनी सराव केला पाहिजे.
#INDvAUS 3rd Test Day 2 : भारतीय संघावर पराभवाचं सावट; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या…
काही क्षणात आपले काय व कुठे चुकत आहे ते समजेल व किमान चौथ्या कसोटीत विजय मिळेल, अन्यथा अशा मानसिकतेने फलंदाजी केली तर ऑस्ट्रेलिया मालिका बरोबरीत सोडवेल, यात शंका नाही.