मुंबई – गोवा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनेक वर्ष आम्ही काँग्रेस पक्षासोबत लढलो आहोत. मागील काळात आम्ही स्वबळावर निवडणुका लढवल्या. याचे निकाल आल्यानंतर जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत दिले नाही हे समोर आले. पाच वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली असती तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची संधी होती, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर मांडले.
परंतु गोव्यात काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे काही लोकांनी भाजपची सत्ता आणण्याचे काम केले. त्यावेळी जे राजकरण झाले त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत असल्याचे मलिक म्हणाले. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो. व्यक्ती पाहून राजकरण होत असेल तर हे अडचणीचे ठरू शकते, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची गोव्यातदेखील काँग्रेस व शिवसेनेसोबत एकत्र येण्याची तयारी आहे. गोव्यात महाविकास आघाडी सारखी गोवा विकास आघाडी तयार केली तर भाजपला हरवणे सोपे होईल. मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांमुळे याला यश मिळत नाही. तरीदेखील खा. प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने सर्वांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसने एकत्र येण्याची भूमिका घेतली नाही तर नाईलाजाने आम्हालाही स्वबळाची भूमिका स्वीकारावी लागेल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.