नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून जे काही घडलं, त्यावरून देशातील राजकारण तापलं होतं. भाजपने या मुद्द्यावरून पंजाब काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. त्यातच आता एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खळबळजनक दावा केला आहे.
काँग्रेस हायकमांड आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी केला आहे. यावेळी शर्मा यांनी चरणजीत सिंग यांच्या अटकेची मागणी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
एका वृत्तवाहिनीने मोदींच्या सुरक्षेमधील गोंधळासंदर्भात केलेल्या स्टींग ऑपरेशनचा हवाला दिला. या स्टींग ऑपरेशननुसार, पोलिसांना दोन जानेवारी रोजीच पंतप्रधानांना जीवे मारण्यासंदर्भातील कटाची माहिती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान सुरक्षेतील त्रुटीच्या प्रकरणानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने विधाने केली, त्यावरून हा कट असल्याचं दिसून येतं, असंही शर्मा यांनी नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या होत्या. आंदोलकांमुळे त्यांचा ताफा 15 ते 20 मिनिटे थांबला होता. या हलगर्जीपणानंतर केंद्र सरकारविरुद्ध पंजाबमधील काँग्रेस सरकार असा वाद सुरू झाला आहे.