नवी दिल्ली – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात होणार असून 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. सीसीपीएने दि.31 जानेवारी ते दि. 11 फेब्रुवारी या कालावधीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा घेण्याची शिफारस केली आहे. तर दि. 14 मार्च ते दि. 8 एप्रिल दरम्यान दुसरा टप्पा घ्यावा, अशी शिफारस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्वाचे असणार आहे. या अधिवेशनात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या पाच राज्यांसह अन्य राज्यांना काय मिळणार? याकडे लक्ष लागून आहे.
करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालल्याने हे अधिवेशन दोन टप्प्यात होत असल्याची माहिती आहे. देशात करोनाचे रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढत असून संसदेतील कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळत आहे. या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत हे अधिवेशन होणार आहे.
राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना करोनाच्या प्रादुर्भावाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.