मुंबई – आंतरराष्ट्रीय विमाने बंद असल्यामुळे सौदीत अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी गो एअर या भारतातील विमान कंपनीने सौदीला 200 चार्टर विमान फेऱ्या करून तब्बल 37 हजार भारतीयांना मायदेशी आणले आहे.
जून 10 पासून गो एअरला विमाने पाठवण्यास अनुमती देण्यात आली. त्यांनी सौदीत अडकलेल्या भारतीयांवरच लक्ष केंद्रीत करून जून ते 4 सप्टेबंर या अवधीत तब्बल 37 हजार 16 भारतीयांना मायदेशी आणून त्यांच्या राज्यात पोहचवले आहे.
वंदे भारत मिशन अंतर्गत गो एअरने हे योगदान दिले असून सौदीतील रियाध, जेद्दाह, आणि दम्माम या ठिकाणांहून दोनशेहून अधिक फेऱ्या पाठवून हे काम केल्याचे आम्हाला समाधान आहे असे या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौशिक खोना यांनी सांगितले.
ही वाडिया ग्रुपची विमान कंपनी आहे. या कार्यात विमान कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अविश्रांत योगदानाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.