माझं नाव आकाश! मी सांगू, माझं नाव आकाश, असं म्हणून मुलगा ज्या ऑफिसमध्ये पाहुणे बसले होते तेथून पळून गेला. कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे आणि संस्थेचे पदाधिकारी बोलत होते. त्याचवेळी आकाश अचानक आला होता. संस्था उभारणी का केली, आता या ठिकाणी किती मुले आहेत, याची माहिती जयराम काका आणि ताई सांगत होत्या. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी मुले येतात. या गप्पांमध्ये सर्वांचे चहापाणी झाले. प्रमुख पाहुणे व इतर गावातील प्रतिष्ठित माणसेही कार्यक्रमासाठी आले होते.
छोटेसे खेडेगाव, पण कान तयार झाला की मन तयार होते या गोष्टीवर विश्वास ठेवून ग्रामीण भागातील शिक्षित, अशिक्षित लोकांचे प्रबोधन व्हावे म्हणून व्याख्यानाचे आयोजन केलेले होते. सत्कार, परिचय, व्याख्यान आणि आभाराने कार्यक्रम संपला. परंतु पाहुण्यांच्या डोळ्यासमोरून आकाश काही जात नव्हता.
श्री. व सौ. जयराम सर यांच्या स्वत:च्या मुलीसह त्यांनी ग्रामीण भागात अशा मुलांसाठी सोय नसल्याने कोणाकडे मुलीला ठेवता आले नाही. त्यांनी स्वत: देखभाल करूनही मुलगी पुन्हा देवाघरी निघून गेली आणि त्या शेतकरी कुटुंबातील दाम्पत्याने निश्चय केला आपल्या प्राजक्तावर जी वेळ आली ती कोणाही मुलांवर येऊ नये. म्हणून त्यांनी संस्थेची स्थापना केली. थोडीशी शेती, स्वत:ची कारकुनाची नोकरी, सांभाळून, संस्थेचा कारभार घरातल्या पैशातून आणि मिळालेल्या मदतीतून चालू केला आहे.
आकाश त्यातीलच एक होता. उंच, देखणा आकाश कार्यक्रमादरम्यान सतत इकडून तिकडे करत होता. त्याच्यासारखी मुले त्याच्या निवासाच्या खोलीत होती. रूपा, बाळू, जयेश, सिमरन, गणेश, शेवंता एक ना अनेक जवळजवळ पन्नासेक मुले मुली संस्थेत होती. प्रत्येकाची सतत काळजी घ्यावी लागत होती. दोघांच्या जोडीला मामा आणि मावश्या मदत करत होत्या. आपल्या मुलांप्रमाणे त्यांना हवं नको त्या पाहात होत्या. कारण त्यांना स्वत:चं स्वत: काही करता येत नव्हते. काहींना जन्मत:च देवाने असे बनविले होते तर, काही मुले गर्भात असतानाच योग्य काळजी न घेतल्यामुळे किंवा वय वर्ष पाचच्या आत असताना पडल्यामुळे मेंदूला मार लागल्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली होती. इतर दिव्यांग मुलांना किमान स्वत:चा एक वेगळा चक्षू असतो, ज्यामुळे त्याचे जीवन त्यांनी विशिष्ट प्रकारचे शिक्षण घेऊन घडवता येते. स्वत:च्या पायावर उभे राहता येते पण या मुलांचे तसे नव्हते.
आकाश सतरा अठरा वर्षांचा होता. दिसायला अतिशय सुंदर. तो आता किमान बारावीत असता; परंतु त्याची बौद्धिक क्षमता दुसरीतल्या मुलाएवढी होती. एक वाक्य विसरून तो परत परत सांगत असे. पण एखादा युवराज शोभावा असा राजबिंडा होता. त्याच्याकडे पाहून वाईट वाटत होते. कार्यक्रम संपल्यावर पुन्हा आकाश समोर आला आणि म्हणाला “सर मी आकाश! तुम्ही परत येणार ना, मला येताना खाऊ घेऊन या! मला कोणीच भेटायला येत नाही. मला जिलेबी लई आवडती’ असं म्हणाला आणि पुन्हा बाहेर पळून गेला.
कार्यालयात पाहुणे लोक बसले होते. सर्व संस्था पाहून झाली होती. या संस्थेत विविध वयोगटाची मुले होती. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून आलेली मुले होती. येथील प्रत्येकजण त्यांची सेवा करत होता. पुन्हा एकदा आकाश आला आणि परत म्हणू लागला, माझं नाव सांगू, मी ना आकाश! बाहेर गेला आणि त्यांच्या खोलीबाहेरील एक तुटकी चप्पल घेऊन आला व म्हणाला, मला एक चप्पल पण घेऊन या आणि “आई व बाबांना सांगा मला भेटायला या’ असं म्हणताच तेथील प्रत्येकाचे हृदय पिळवटून जात होते. प्रत्येक जण स्वत:ला भाग्यवान समजत होता की आपली मुले छान आहेत. या मुलांच्या आई-वडिलांची अवस्था काय होत असेल? या मुलांना काही आईवडील देवाने दिलेली देणगी समजून वाढवतात. घरात असलेल्या दुसऱ्या मुलांपेक्षा, हा मुलगा, मुलगी वेगळी असून त्यांचं सर्व काही करतात. तर काहीजण त्यांना प्राजक्ताच्या नावाने असलेल्या या संस्थेत घेऊन येतात.
जर विचार केला तर इतर अशी अनेक घरं आहेत की ती आपल्या मुलांवर रागावतात, चिडतात, प्रसंगी मारहाण करतात. घरातील एकाची दुसऱ्याशी तर नातेवाईकाच्या मुलांशी तुलना करतात. नेहमी म्हणत असतात, “एक ना धड भाराभर चिंध्या’ जेव्हा एकापेक्षा जास्त मुले घरात होती त्यावेळी हे वाक्य नेहमी प्रत्येक घरात ऐकायला येत होते. यातूनच मी ही मुले आईवडिलांपासून दूर जातात. कधी कधी तर चिडून जाऊन आई असंही म्हणते, माझ्याच पोटी बरा जन्माला आलास, कोणत्या मुहुर्तावर आलास कोणाच ठाऊक किंवा कोणावर गेलाय काय माहीत? तीन तऱ्हेची तीन आहेत, अशी अनेक वाक्ये सर्रास ऐकायला मिळतात. मुलं बिचारी गुमान ऐकून घेतात. मग कधी कधी मुलगा मोठा झाल्यावर हेही म्हणायला घाबरत नाही की, “मग कशाला मला जन्म दिलास?’ याच विचारात कार्यक्रमातील प्रत्येकजण या मुलांना पाहून स्वत:च्या घरातील संवाद आठवत होता. मुलं ही मुलंच असतात, देवाघरची फुलं असतात. घरातील बागेतील संसाराच्या वेलीवरील उमललेली फुलं असतात. नातवंडं ही आजोबांच्या दुधाची साय असते. आनंदाची बाग असते, यासाठी तरी प्रत्येकजणानं म्हणावं, देवा मला दिलेली देणगी आहे, मला मूल तरी दिलंस, ज्यांना नाही त्यांचं काय होत असेल. यापुढे मी म्हणणार आहे, “कुणालाही हेवा वाटावा अशी माझी संतान छान आहे निर्मिती त्या विधात्याची मिळाली मला दान आहे’
ऊन-सावली
अनिल गुंजाळ
खूप खूप छान.जैसे द्यावे तैसेचि रहावे.
सर मानवाला मिळालेल्या गोष्टीमध्ये समाधान मानता आले पाहिजे. फक्त ज्या गोष्टी मानवाच्या हातात नाहीत त्याबद्दल त्यांनी कधीच वाईट वाटून घेऊ नये.
ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असावे समाधानी.
आणि खरेच अशा संस्था जे कोणी चलवतात त्यांना माझा सलाम
Khup sundar