मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कोविड विरोधी लसीचे विक्रमी डोस देण्यासाठी भारतात 15 ते 20 दिवस आधी अत्यंत कमी डोस पुरवले गेले होते असा आरोप राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी पावणे तीन कोटी लोकांना लसींचे डोस दिले जाऊ शकत असतील तर त्याच प्रमाणात देशात पुढील महिनाभर किंवा उद्या डोस का दिले जाऊ शकत नाहीत? देशात या आधीच या प्रमाणात लसीकरण करणे गरजेचे होते. केवळ एखाद्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम करणे अन्यायकारक आहे असेही मलिक यांनी म्हटले आहे.
काल मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त देशात विविध ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कोविड लस देण्याचा उपक्रम चालू ठेऊन सुमारे 2 कोटी 37 लाख लोकांना लसी देण्यात आल्या आहेत. त्याचे कौतुक सुरू असतानाच आता त्यावर वेगवेगळ्या कारणाने टीकाही सुरू झाली आहे.
दरम्यान खुद्द मोदींनीही काल या विषयावर राजकीय भाष्य केले होते. गोव्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले आहेत की एकाच दिवसात अडीच कोटी लोकांना डोस देण्यात आल्यानंतर एका राजकीय पक्षाचा ताप वाढला आहे. या उपक्रमावर भाष्य करताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की काल एका दिवसात जितके डोस दिले गेले त्याच प्रमाणात अन्य दिवसांतही लोकांना डोस मिळाले पाहिजेत.