केंदूर-गावाला पूर्णवेळ तलाठी द्यावा अशी मागणी केंदूरच्या सरपंच वंदना ताठे आणि उपसरपंच दत्तात्रय थिटे यांनी शिरूरच्या तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
बारा वाड्या आणि एक गावठाण असा तालुक्यातील सर्वांत मोठा विस्तार असलेले आणि सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या केंदूर गावाला तलाठी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने गावकरी संताप व्यक्त करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी रुजू झालेले तलाठी शरद सानप हे कार्यालयात वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कार्यालय नेहमीच बंद असल्याने कार्यालयाबाहेर ग्रामस्थांना वाट पाहावी लागते. दाखले, सातबारा वेळेवर मिळत नाहीत ग्रामस्थांना विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महसूल प्रशासनाच्या अशा कारभारामुळे नागरिकांची फरपट होत आहे. गावात तलाठी उपलब्ध नसल्याने लोकांची अनेक शासकीय कामांना अडथळा येत आहे.
गावात अशा प्रकारे तलाठ्यांचा लपंडाव सुरू असल्याची ग्रामस्थांनी गावपुढाऱ्यांकडे तलाठी सानप यांची वेळोवेळी तक्रार केली होती, त्याच पार्श्वभूमीवर शिरूरच्या तहसीलदार एल. डी. शेख यांनी सानप यांना कार्यालयात विनापरवाना गैरहजर राहिल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सानप यांनी त्या नोटीसला देखील केराची टोपली दाखवत कार्यालयात उपस्थित राहायला जाणूनबुजून टाळाटाळ करत आहे. त्यांचा फोनद्वारे देखील संपर्क होत नाही. अशा तलाठी कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.