नवी दिल्ली – राजस्थानमधील 33 जिल्ह्यांमधील एकूण 200 पैकी 199 विधानसभेच्या जागांसाठी नुकतेच मतदान पार पडले. निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप ताकदीने उतरल्याने यावर्षी जवळपास 75.45 टक्के मतदान झाले आहे. हे मतदान 2018 मधील निवडणुकीपेक्षा जास्त आहे. परिणामी जास्तीचे मतदान कुणाला तारणार अन् कुणाला मारणार, याचीच चर्चा सुरू झाली आहे.
यामुळेच काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरु झाली आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी तेलंगणात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी राजस्थानमध्ये काँग्रेस यंदा परंपरा मोडणार असून, पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच राजस्थानच्या संभाव्य मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद पक्षातील नेत्यांमध्ये नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सचिन पायलट म्हणाले, राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नाही. काँग्रेसमध्ये नेता निवडीची एक प्रथा आणि परंपरा आहे. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांची बैठक होते. या बैठकीत आमदारांचे मत जाणून घेतले जाते. त्याची माहिती पक्षश्रेष्ठीला दिली जाते. त्यानंतर नेता निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. हा निर्णय सर्वांना मान्य असतो. त्यामुळे कोणताही वाद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी तेलंगणात काँग्रेस सत्तेवर येणार असून, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने लोकांमध्ये तीव्र संताप असल्याचेही विधान केले आहे.
दुसरीकडे मी मुख्यमंत्रिपदाची दावेदारी का सोडेन?, असं मत गेहलोत यांनी व्यक्त केले आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रिपदाबाबत काही दिवसांपूर्वी प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, ‘मुख्यमंत्रिपदावर सध्या बोलण्याची गरज नाही. आमच्या पक्षाची भूमिका हायकमांड ठरवते. हायकमांड जेव्हा कोणाच्या बाजूने निर्णय घेते. तेव्हा भविष्यात त्याला कोणी आव्हान देत नाही. मुख्यमंत्रिपदाचा दावा केला नाही, तरी मुख्यमंत्रिपदच मला सोडणार नाही.’ या विधानासंदर्भात गेहलोत यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले, “पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हे मी कसे सांगू? माझं यापूर्वीचं विधान हे पक्षाच्या हितासाठी होते, असेही त्यांनी सांगितले.
तसेच कोणाला मत द्यायचे हे लोकांना कळेल तेव्हाच पक्षाचा विजय होईल. मी काम केले आहे आणि राज्य सरकारने चांगले काम केले आहे, असे लोक म्हणत असतील आणि ते माझ्या नावावर मत देत असतील, तर मी दावेदारी का सोडेन? मी जरी मुख्यमंत्रिपदाचा दावा केला नाही तरी मुख्यमंत्री हे पद मला सोडणार नाही, असे मी जबाबदारीने म्हटले होते.