चिंबळी -खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील गावांमधील शेतकऱ्यांनी टोकणपद्धतीने लसूण पिकाची लागवड सुरू केली आहे. खेडच्या दक्षिण भागात ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये परतीच्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने यंदा रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, गहू पिकाबरोबरच इतर पिकांची लागवड उशीरा झाली. तर गेल्या आठ दिवसांपासून चिंबळी, केळगाव, मोई, निघोजे आदी परिसरात शेतकऱ्यांनी लसूण पिकाची टोकण पद्धतीने लागवड सुरू केली आहे.
दरम्यान, गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी टोकण पद्धतीने लागवड लागवड करण्यात आलेल्या गहू, हरभर पिकावर ढगाळ वातावरणामुळे लाल व काळ्या किडी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे, तर काही ठिकाणी पिके पिवळी पडली आहे. त्याचबरोबर कांदा व ज्वारी पिकावरही रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
तसेच परतीच्या दमदार झालेल्या पावसामुळे अद्यापही ओल टिकून असल्याने पिकांमध्ये तण वेगाने वाढत आहे. त्यातच शेतमजुरांची टंचाई होत असल्याने शेतकऱ्यांना स्वत:च शेतात खुरपणीच्या कामास राबावे लागत आहे.