हिंदू संस्कृतीत असलेले सण-उत्सव, पूजा-पाठ, होम-हवन, व्रत-वैकल्ये, उपवास-तापास, पारायण, भजन-कीर्तन-प्रवचन अशा कितीतरी गोष्टी ह्या केवळ आणि केवळ पर्यावरणाशीच निगडित आहेत. मानवी मन-शरीर आणि त्याच्या भोवतालची परिस्थिती सात्त्विक राहून त्याच्या जीवनात आनंदाची पर्वणी बहाल करणाऱ्या ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक शास्त्रांशी तर संबंध येतोच आणि पंचमहाभूतांचासुद्धा समतोल सांभाळणे सहज शक्य होते.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच ओवी रचून ॐकाररूप श्री गणेशाच्या अखिल विश्वाच्या मूळ बीजाला नमन केले आहे.
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।।1।।
असे म्हणत…
देवा तूंचि गणेशू । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणेजे निवृत्तीदासु । आवधारिजो जी ।।
श्रीसमर्थ रामदास स्वामींनी “दासबोधा’त श्री गणेश स्तवनासाठी सलग तीस ओव्या रचल्या. त्यातील एका ओवीत रामदास स्वामी म्हणतात, “वंदुनिया मंगळानिधी। कार्य करिता सर्वसिद्धि । आघात अडथळे उपाधी । बांधू सकेना…
श्री गणेश म्हणजे कल्याणाचा सागर आहे. अशा देवाला नमस्कार करून कार्य आरंभिल्यास ते सर्व सिद्धीस जाते. आघात, अडथळे, उपाधी यांची पीडा होऊ शकत नाही असे सांगून सर्वांगसुंदर व सर्व विद्यांची खाण अशा श्री गणेशाला भक्तीपूर्वक नमस्कार केला आहे.
मानवाचे अध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी संतांनी भक्तितत्त्व, अध्यात्मचिंतन आणि तात्त्विक मूल्यांची शिकवण दिली. तसेच ज्या देहाच्या आधारे परमात्मा स्वरूपाकडे जायचे आहे धर्म, अर्थ काम, आणि मोक्ष साध्य करायचे आहे हे चारही पुरुषार्थ साध्य करण्यासाठी देह हा निरोगी, सुदृढ, प्रसन्न आणि आनंदी राहावा यासाठी चांगल्या पर्यावरणाची गरज आहे. चांगले पर्यावरण सुरक्षित राहण्यासाठी माणसाला काळाची पावले ओळखूनच वागायला हवे म्हणजेच पंचमहाभुतांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश ह्यांना प्राप्त झालेली शक्ती ही परमेश्वरानेच बहाल केली आहे. प्रत्येक महाभूताचे काही गुणधर्म आहेत जे आपण आकलन करू शकतो.
पृथ्वी –
पृथ्वीमध्ये जडत्व आहे त्याला घनत्व आहे. याशिवाय त्याच्यामध्ये गंधही आहे याचा आपण अनुभव करू शकतो. त्याचबरोबर स्पर्शातूनही अनुभव करू शकतो.
आप –
यामध्ये तरलता आहे, वजन आहे, आपल्यामध्ये सामावून घेण्याची शक्ती आहे, कोणत्याही जलपदार्थाला आपल्यात विरघळून घेणे म्हणजे सामावून घेणे. यात चवही आहे.
तेज-
यामध्ये प्रकाश आहे, गतिमानता आहे, उष्णता आहे, द्रवपदार्थांना वायुरूप करण्याची शक्ती आहे. याचा अनुभव आपण दृष्टीने करू शकतो.
वायू –
वायू हा अत्यंत हलका आहे. त्यामध्ये गतिमानता आहे. जड पदार्थांना उडवून देण्याची शक्ती आहे. तरल पदार्थांना वाहून नेण्याची शक्ती आहे. अग्नीला विझविण्याची शक्ती आहे, गंध वाहून नेण्याची शक्ती यात आहे, वायूला वेग असताना स्पर्शाची जाणीव होते.
वरील चारही महाभूतांना सामावून घेणारे
आकाश –
आकाश म्हणजे पोकळी, जड पृथ्वी असो. आप रूप समुद्र असो, तेज रूप सूर्य असो किंवा वायू ह्या सर्वांनी कितीही शक्तिप्रदर्शन केले तरी ते आकाशातच समाविष्ट होतात. त्यापलीकडे जाऊच शकत नाही. आकाशची जाणीव आपण शब्दांद्वारे करू शकतो. या चराचर जगतामध्ये जी काही उलाढाल होत आहे ते आकाश स्वत:मध्ये सामावून घेते यालाच नादब्रह्म म्हणतात. पंचमहाभूतांना आपण वैधानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यांचे विविध गुण आपल्या लक्षात येतात. त्यांचे आचरण-दैनंदिनता एका विशिष्ट नियमानुसार होत असते म्हणजेच परब्रह्माच्या हुकुमानुसार उत्पत्ती, स्थिती, लयाची कार्ये करतात. ही भूते स्वतंत्र असली तरी परब्रह्माच्या कार्यकारणभावानुसार समतोल राखतात व कार्य करतात.
पंचमहाभुतांच्या उद्रेकामुळे दुष्काळ, रोगराई, मृत्यू, उपासमार, विषार, महामारी, प्रदूषण यांसह अनेक अनाकलनीय गोष्टी सृष्टीमध्ये होत असतात. यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक शास्त्रांचा आधार घेऊन अनेक देश – राष्ट्र – संस्था काम करतात. म्हणजेच पर्यावरणाशी मैत्री जोडून स्वास्थ्य, सुरक्षा, संपदा किंवा विकास आणि समृद्धी व शांतता मिळविण्यासाठी अनेक शास्त्रांची तत्त्वे, संशोधन व शास्त्रीय शोध यांचा उपयागे होतो. यातून पर्यावरणाचे स्वतंत्र शास्त्र बनले आहे, या शास्त्रामध्ये सर्व शास्त्रांचा उपयोग होतो. उदा शरीरशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, भूगोल, भूगर्भशास्त्र, वातावरण शास्त्र, हवामानशास्त्र, गणित-संख्याशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, वैद्यकीयशास्त्र इत्यादी. ह्या सर्व शास्त्रांच्या सिद्धांतांचा व पद्धतींचा वापर पर्यावरणशास्त्रात होतो.
पर्यावरणाचे प्रश्न म्हणजे अतिउष्णता, अतिपाऊस, भूकंप, वादळे, दुष्काळ, आकाशातील उत्तम संरक्षक कवचाचा (ओझोन) नाश व सूर्याच्या घातक किरणांचा परिणाम अशा गोष्टी पृथ्वीवरील स्वर्गाचा नाश करणाऱ्या या आपत्ती नैसर्गिक असतील तर त्याला आस्मानी संकट म्हणततात, पण ही संकटे माणसाने निसर्गनियम मोडल्यामुळे व पंचमहाभूतांच्या कार्यात अडथळे आणून त्यांची शिस्त बिघडविल्यामुळे मानवाने स्वत:ची मनमानी केल्यामुळे जेव्हा निर्माण होतात तेव्हा माणसाने हे वास्तव सत्य नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, मनुष्य हा प्रकृतीचा म्हणजेच निसर्गाचा म्हणजेच त्याच्या शरीरातील व बाहेरच्या पंचमहाभुतांचा दास आहे.
पर्यावरणाशी बेभानपणे व बेफाटपणे वागण्याऐवजी पर्यावरणाशी मैत्रीने व नम्र राहून त्यांना शांत ठेवूनच पृथ्वीमातेवर नंदनवन निर्माण केले पाहिजे. म्हणूनच हिंदू संस्कृतीत असलेले सण-उत्सव, पूजा-पाठ, होम-हवन, व्रत-वैकल्ये, उपवास-तापास, पारायण, भजन-कीर्तन-प्रवचन अशा कितीतरी गोष्टी ह्या केवळ आणि केवळ पर्यावरणशीच निगडित आहेत. मानवी मन-शरीर आणि त्याच्या भोवतालची परिस्थिती सात्विक राहून त्याच्या जीवनात आनंदाची पर्वणी बहाल करणाऱ्या ह्या सर्व गोष्टी आहेत. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक शास्त्रांशी तर संबंध येतोच आणि पंचमहाभुतांचा सुद्धा समतोल सांभाळणे सहज शक्य होते आणि म्हणूनच भाद्रपद शु. 4, 22 आगस्ट, 2020 रोजी येणाऱ्या श्री गणेश चतुर्थीला इको फ्रेंडली गणेश मूर्ती स्थापनेसह पंचमहाभुतांशी निगडित अनेक गोष्टींची आपण खबरदारी घेऊन महाराष्ट्राचा हा महाउत्सव श्री गणेशोत्सव आनंदाने साजरा करुयात.
जय गजानन
– विद्यावाचस्पती कांचन सातपुते