सातारा – फलटण येथील नॅशनल करिअर अकॅडमीच्या विद्यार्थीनींनी सीमेवरील जवानांना राख्या पाठवल्या आहेत. राखीपौर्णिमा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उद्या (दि. 11) रक्षाबंधन आहे. बहिण आपल्या भावाला राखी बांधून भावाचे प्रेम आणि संरक्षण मिळवत असते. मात्र देशाच्या रक्षणासाठी, आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना या सणासाठी घरी येणे शक्य नसते. त्यामुळे त्यांना भगिणी पोस्टाने राख्या पाठवत असतात. नॅशनल करिअर अकॅडमीत सैनिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींनी देखील जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना राख्या पाठवल्या आहेत.
भारतीय लष्करातील विविध विभागातील जवानांना या राख्या पाठवण्यात आल्यात. त्यामध्ये मराठा बटालिय, सिख बटालिय यांसह विविध विभागातील जवानांसाठी 501 राख्या पाठवल्या आहेत. अकॅडमीचे संचालक माजी वाॅरंट ऑफिसर कुमार परदेशी यांनी याबाबत माहिती दिली. काजल देवकते, निकिता जावळे, जयश्री पारेकर, ऋतुजा साळुंके, उज्वला वाकडे, वैष्णवी साळुंके, निशा सुर्यवंशी, समिक्षा कदम, ऋतुजा जगताप, वैष्णवी भगत, रुक्मिणी गावडे, किरण भंडलकर यांसह आदी विद्यार्थीनींनी आपल्या जवान बांधवांना राख्या पाठवल्या.