फुरसुंगी पॉवरहाऊस येथील रेल्वे उड्डाणपुलाची दुरवस्था ेः वाहतूक कोंडी
फुरसुंगी – हडपसर-सासवड मार्गावर फुरसुंगी पॉवरहाऊस येथे असणारा रेल्वे उड्डाणपूल खूपच अरुंद असून रस्त्याची कमालीची दुरवस्था झाली आहे. वारंवार मागणी करूनही या पुलाचे रुंदीकरण होत नसल्याने रोज वाहतूक कोंडी व जीवघेणे अपघात घडत असल्याने हा उड्डाणपूल अपघात व मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाला दुसरा समांतर उड्डाणपूल उभारण्याची गरज असूनही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
हडपसर-सासवड मार्गावर फुरसुंगीफाटा येथे रेल्वे क्रॉसिंगमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बांधलेला उड्डाणपूल अतिशय सदोष पद्धतीने तसेच खूपच अरुंद बांधला आहे. या पुलामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी वाढून अपघात होत आहेत. या अरुंद पुलावर एखादे वाहन बंद पडल्यास एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद होऊन पुलापासून दोन्ही बाजूला दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. पाच-पाच तास वाहतूक ठप्प होत असल्याने हा उड्डाणपूल असून अडचण नसून खोळंबा झाला आहे.
हा पूल फुरसुंगी फाट्यावरून सुरु होत असल्याने फुरसुंगीगावातून येणारी व जाणारी वाहने याठिकाणी वळताना जागा खूपच अरुंद असल्याने वाहने वळताना सासवड मार्गावर जात असल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन कोंडी होते तर, दुसरीकडे हा पूल मंतरवाडी चौकाजवळच उतरत असल्याने याठिकाणी दिवसरात्र वाहतूक कोंडी झालेली दिसून येते. कारण या मार्गावरून अहोरात्र अवजड वाहनांची वर्दळ सुरू असल्याने हा मार्ग धोकादायक झाला आहे. त्यामुळे या पुलाला समांतर उड्डाणपूल उभारून रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे.
बेशिस्तपणे वाहने चालवून वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे कारण कंपन्या व गोदामांमध्ये मालाची ने-आण करणारी वाहने कोंडीत अडकून पडत असल्याने मोठे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कडक कारवाई केली पाहीजे.
– ज्ञानेश्वर मोडक, व्यावसायिक
पुलावरील वाहतूक कोंडीमुळे रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना वेळेत पोहोचता न आल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर अग्णिशमन दलाच्या गाड्यासुद्धा अनेकदा वाहतुकीत अडकत असल्याने मोठी दुर्घटना होऊन हानी होण्याचा धोका संभवतो.
दिलिप भाडळे, सामाजिक कार्यकर्ते
मंतरवाडी चौक, उड्डाणपूल व फुरसुंगी फाटा येथील वाहतूक कोंडीमुळे नोकरदार, कामगार तसेच विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षेला पोहोचता न आल्याने अनेकांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या पुलाचे रुंदीकरण करावे.
– कैलास इसाळे, नोकरदार
उड्डाणपुलावर खड्डे, रस्त्यामध्ये चढ-उतार असल्याने वाहने घसरत आहेत. पुलावर कोणतीही दिवाबत्तीची सोय नाही, त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहने खड्ड्यात जाऊन अपघात घडत आहेत. तसेच, पुलावर एखादे वाहन बंद पडल्यास वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नाही.
– नागेश हरपळे, स्थानिक रहिवासी