पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आपल्याकडे अत्यंत संवदेनशील मुद्दा आहे….होता. होता म्हणायचे कारण पूर्वी चार सहा महिन्यांत पेट्रोलचे दर रूपया दोन रूपयाने वाढायचे.
तेव्हा देशातले असे एकही राज्य व त्या राज्यातील एकही प्रादेशिक नेता असा नसायचा की तो या वाढीबद्दल केंद्र सरकारला लक्ष्य करण्याची संधी सोडायचा.
पण आताच्या सरकारने त्या नेत्यांचीही अडचण करून ठेवली आहे. पेट्रोलचे दर रोजच वाढत आहेत. ज्या दिवशी ते वाढले नाही, त्या दिवशी बातमी होते.
बरे वाढ तरी किती 15, 16, 18 पैसे. असे असताना वाढीबद्दल काही बोलले तर आपली अब्रू जायची अशी भिती अनेकांना वाटत असावी.
पण या वाढीबाबत नेता आणि अभिनेता असलेल्या उर्मिला मातोंडकरने तोंड उघडले आहे. ती सध्या शिवसेनेत आहे. अगोदर कॉंग्रेसमध्ये होती. त्यामुळे केंद्र सरकार भाजपचे असल्याने तिला टीका करायला कोणती अडचण आली नाही.
असेही चुकीच्या बाबींबद्दल कलाकार, साहित्यीक, विचारवंतांनी तोंड उघडणे अपेक्षित असते. ती अपेक्षा उर्मिलाने पूर्ण केली आहे. पेट्रोलने शंभरी गाठली आहे. डिझेलही त्याच मार्गावर आहे.
सर्वसामान्य नागरिक ओरडताहेत, मालवाहतूकदार ओरडताहेत. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करते आहे. आता उर्मिलानेच विषयाला तोंड फोडल्यामुळे सरकारला यातून काहीतरी प्रेरणा मिळेल.
एखाद्या निर्मात्याला किंवरा दिग्दर्शकालाही प्रेरणा मिळेल. रामगोपाल वर्माने बऱ्याच दिवसांत चित्रपट काढलेला नाही. काही विचार आहे का?