पिंपरी – या आठवड्यात भाजीपाल्यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. बाजारात आवक वाढल्यामुळे शेवगा, काकडी आणि बटाट्याचे दर कमी झाले आहेत. तर लसूण आणि हिरव्या मिरचीची आवक कमी झाल्याने भाव चढेच असून, लसणाचा भाव दीडशे रुपयांवर पोहोचला आहे. पालेभाज्यांची आवक घटल्याने कोथिंबीर आणि शेपूच्या दरात वाढ झाली आहे.
पिंपरी मंडईमध्ये रविवारी (दि. 2) भाजी खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात दर घसरले आहेत. आज भाजीमंडईमध्ये कांद्याबरोबरच बटाट्याचेही भाव कमी झाले आहेत. तर मटार, काकडीची आवक वाढल्याने भावात घट झाली आहे. मटार चाळीस रुपये तर, काकडीचा दर पंचवीस रुपये किलो आहे. दरम्यान, टोमॅटोच्या दरात घसरण कायम आहे. तर संक्रांतीच्या सणामुळे वाढलेले गाजर, पावट्याचे दरही मात्र घसरले आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत कोबी आणि फ्लॉवरचे दर घटले असून, दोन्हीचे दर तीस रुपये किलो आहेत. काही महिन्यांपूर्वी अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत गेलेला शेवगा आता ऐंशी रुपयांवर आला आहे.
वातावरणातील बदलामुळे पालेभाज्या पुन्हा महागल्या
वातावरणातील बदलाचा पालेभाज्यांवर मोठा परिणाम झालेला पहायला मिळाला. पालेभाज्या खराब झाल्यामुळे यंदाच्या आठवड्यात कोथिंबीर आणि मेथीची आवक घटली आहे. त्यामुळे त्यांच्या दरात वाढ झाली. याबरोबरच, शेपू, आंबट चुका आणि कांदापात यांचे दर वाढले आहेत.
भाजीपाला विक्रीचे दर (भाव प्रतिकिलो)
बटाटे : 25 ते 30, कांदे : 30 ते 40, टोमॅटो : 10 ते 20, गवार : 50 ते 60, दोडका : 50 ते 60, घोसाळी : 50, लसूण : 150 ते 180, आले : 70 ते 80, भेंडी : 50 ते 60, वांगी : 50 ते 60, कोबी : 30, फ्लॉवर : 30, शेवगा : 80 ते 90, हिरवी मिरची: 70 ते 80, शिमला मिरची : 40 ते 50, पडवळ : 50, दुधी भोपळा : 30 ते 40, लाल भोपळा : 40 ते 50, काकडी : 20 ते 30, चवळी : 50, काळा घेवडा : 50, तोंडली : 50, गाजर : 30 ते 40, वाल : 60, राजमा : 50, मटार : 30 ते 40, कारली : 40, पावटा : 40 ते 50, लिंबू : 200 (शेकडा). तर, कोथिंबीर : 15, मेंथी : 15, शेपू : 10, पालक : 10, मुळा : 10, तांदुळजा : 10, पुदिना : 5, कांदापात : 15, चाकवत 10, सरसू 10, आंबट चुका 20.