देशातील सर्वात जुना आणि तळागाळापर्यंत पोहोचलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक शनिवारी राजधानी नवी दिल्लीत पार पडली आणि या बैठकीच्या निमित्ताने कॉंग्रेस संघटनेने विचारमंथन केले, हे बरे झाले. पक्ष संघटनेच्या कारभारावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष टीका करणारा पक्षातील जो “जी23′ नावाने ओळखला जाणारा गट आहे त्या गटाचे नेतेही या बैठकीला उपस्थित असल्याने त्यांचे कान टोचण्याचे प्रयत्नही या बैठकीत झाले.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशातील लखीमपूर घटनेनंतर पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी ज्या प्रकारे हा विषय हाताळला आणि सरकार विरोधात वातावरण निर्मिती केली त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत निश्चितच राहुल गांधी यांचे नेतृत्व उठून दिसले. अर्थात सध्या कॉंग्रेसला औपचारिकपणे असा पूर्णकालीन अध्यक्ष नाही. सोनिया गांधी यांच्या नावामागे कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष हेच पद आहे. राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी कॉंग्रेसचे अध्यक्षपद नाकारल्याने कॉंग्रेसचे हंगामी अध्यक्ष पद सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आले होते.
याच एका मुद्द्यावर पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त करून पक्षाला पूर्णकालीन अध्यक्ष असावा, असे मत व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांनी “मीच पक्षाची पूर्णकालीन अध्यक्ष आहे’, हे स्पष्टपणे बजावल्याने किमान या विषयावरील चर्चा तरी आगामी कालावधीमध्ये थंडावेल असे दिसते. एक लक्षणीय गोष्ट म्हणजे या बैठकीत जेव्हा कार्यकारिणी सदस्यांनी राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळावी अशी विनंती केली तेव्हा राहुल गांधी यांनी थेट नकार न देता “मी या प्रस्तावाचा विचार करेल’, असे म्हटले आहे. हीसुद्धा एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.
2019च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला पुन्हा एकदा हार पत्करावी लागल्यानंतर राहुल गांधी एकदमच कोशात गेले होते. त्याच सुमारास कॉंग्रेस पक्ष संघटनेमध्ये तरुणांनी कारभार चालवावा, अशी त्यांची भूमिका असतानाही त्यांच्या या भूमिकेला अनेकांनी विरोध दर्शवला होता. म्हणून ते नाराज होते. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत राहुल गांधी पुन्हा एकदा सक्रिय झाले असून नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात चांगले वातावरण निर्मिती त्यांनी केली आहे. ज्या प्रकारे त्यांनी आणि प्रियांका गांधी यांनी लखीमपूर प्रकरणाचा विषय उचलला ते पाहता राजकारणात एक सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची योग्य वाटचाल चालू आहे, असे म्हणावे लागेल.
या बैठकीच्या निमित्ताने सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतचा विषय संपुष्टात आणला असला, तरी पक्ष संघटना अधिक सक्रिय करण्यासाठी पक्षाला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत ही बाबही नाकारून चालणार नाही. अनेक राज्यांमध्ये सध्या कॉंग्रेसची सत्ता नसल्याने तेथील पक्षसंघटन कमकुवत झाले आहे. ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेसचे पक्ष संघटन चांगले आहे आणि त्यांचा नेताही चांगला आहे त्या राज्यांमध्ये कॉंग्रेसला निवडणुकीत यश मिळते, असे आतापर्यंत सिद्ध झाले आहे.
लवकरच होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी म्हणून कॉंग्रेसला आपल्या या पक्ष संघटनेवरच आता लक्ष द्यावे लागणार आहे. ज्या प्रकारे गेल्या काही महिन्यांमध्ये कॉंग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये किंवा राजस्थानमध्ये पक्षांतर्गत वादळ निर्माण झाले होते. त्या घटना पुन्हा होऊ नये यासाठी काळजीही घ्यावीच लागणार आहे. पुढील वर्षाच्या मध्यात कॉंग्रेस पक्ष संघटनेची निवडणूक होणार आहे त्यापूर्वी सदस्य नोंदणी केली जाणार आहे. या अभियानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम कॉंग्रेस पक्ष संघटना करू शकते. या बैठकीच्या निमित्ताने कॉंग्रेस पक्षातील एका नाराज गटाला शांत करण्याचे प्रयत्न जरी सोनिया गांधी यांनी केले असले,
तरी या गटाचे म्हणणेही लक्षात घ्यावे लागणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉंग्रेस पक्ष सोडून भाजप किंवा इतर पक्षांमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. किमान पक्ष सोडून जाणाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी सूचना या नाराज गटाने केली आहे, तीसुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. पक्ष कोणीही सोडून गेले तरी आमच्यावर काही फरक पडणार नाही, ही भूमिका आता विद्यमान परिस्थितीत कॉंग्रेसला स्वीकारता येणार नाही. पक्ष सोडून गेलेल्यांपैकी काही जण पुन्हा स्वगृही परतण्यास इच्छुक असतील, तर त्याबाबतही कॉंग्रेस पक्षाने हालचाली करायला हव्यात. देशाच्या विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष प्रबळ होत असताना त्याचा थेट फटका भाजपला न बसता कॉंग्रेसलाच बसत आहे,
असा आजवरचा अनुभव सांगतो. ज्याप्रकारे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसने आपले बस्तान बसवले आहे ते पाहता या अनुभवापासून काहीतरी शिकावे लागणार आहे. कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले नवीन पक्ष चांगले वाढत असताना मूळ कॉंग्रेस पक्षाला जर समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्याचा विचारही गांभीर्याने करावा लागणार आहे. राहुल गांधी यांनी वेळीच जर पक्षाची धुरा सांभाळली असती, तर पक्षाची पडझड बऱ्यापैकी थांबली असती पण तसे झाले नाही. आता मात्र आगामी कालावधीमध्ये राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होतील, असे संकेत मिळत आहेत.
पक्षाला पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी राहुल गांधी आणि त्यांच्या विचारांची कॉंग्रेसमधील तरुणांची टीम मनापासून काम करेल, असेही दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधुनिक काळातील राजकारणामध्ये जी एक गती पकडावी लागते ती गती पकडण्याचे काम आता कॉंग्रेसच्या संघटनेला आणि नेत्यांना करावे लागेल. पूर्वीच्या पद्धतीने काम लांबवून किंवा प्रलंबित ठेवून विनाकारण निर्णय लांबवणे आता परवडणारे नाही, हेही यानिमित्ताने समोर आले आहे.
गेल्या सात वर्षांच्या कालावधीमध्ये प्रथमच सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात प्रचंड विरोधी वातावरण तयार झाले आहे. त्याचा लाभ घेण्याचे काम आता कॉंग्रेस पक्ष संघटनेला करावेच लागेल. केंद्रातील भाजप आणि नरेंद्र मोदी यांना उत्तम आणि योग्य पर्याय म्हणून कॉंग्रेस आणि राहुल गांधी हेच आहेत, हे या निमित्ताने ठसवण्याचे काम आगामी कालावधीमध्ये आता पक्ष संघटनेला करावे लागेल.