पुणे – “साहेब, नुसतेच पाहणी दौरे करुन पोकळ घोषणा करुन नागरिकांच्या तोंडाला पाने पुसू नका. दरवर्षी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरुन होत असलेले लाखो रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची कामे जलद गतीने करा,’ अशा शब्दांत धानोरीतील नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे आक्रोश व्यक्त केला.
धानोरी परिसरात मागील शनिवारी (दि.9) पावसाने थैमान घातले होते. यात नाल्यातील पाणीही बाहेर ओसंडून वाहत नागरिकांच्या घरांत शिरले. बहुसंख्य घराच्या व नाल्याच्या सीमाभिंतीही कोसळल्या. नागरिकांच्या घरातील अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, महत्वाची कागदपत्रे, शालेय साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले.
दरम्यान भाजपचे स्थानिक नगरसेवक अनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या मलनि:सारण प्रकल्प व देखभाल दुरुस्ती विभागातील अधिकक्ष अभियंता संतोष तांदळे, उपअभियंता विनायक शिंदे, सुहास अलबर, कनिष्ठ अभियंता भिमराव खरे या अधिकाऱ्यांच्या पथकाने धानोरी परिसरात ठिकठिकाणी जावून पाहणी करुन समस्या जाणून घेतल्या. मयुर किलबिल, लक्ष्मीनगर, दत्तनगर, गोकूळनगर, विघ्नहर्ता कॉलनी, सुदामानगर, आंबेडकर शाळा परिसर या भागात अधिकाऱ्यांनी भेट दिली.
मयुर किलबिल येथे बॉक्स कल्व्हर्ट उभारणे, लक्ष्मीनगर येथे पावसाळी लाइन टाकणे, भरत ढाबा ते डॉ. आंबेडकर शाळेपर्यंत स्टॉर्म वॉटर-ड्रेनेज लाइन टाकणे, विघ्नहर्ता कॉलनी येथे नाला सफाई व खोलीकरण करणे, नाल्याच्या सिमाभिंतीबाबतचा तिढा सोडविणे आदी कामे सुरु आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान महापालिकेच्या विकास आराखड्याप्रमाणे विविध ठिकाणी नाल्यांचे रुंदीकरण झालेले आढळत नाही. नाल्यात भरावही टाकण्यात आलेला आहे. याप्रकरणी बांधकाम विभागाला लेखी पत्र पाठवून तपासणी करुन कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे.
नुकसान भरपाई मिळणार कधी?
पुणे महापालिका व जिल्हा प्रशासनाने पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तहसलीदार, तलाठी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही विविध भागात येऊन गेले. काय काय नुकसान झाले याची माहिती घेत नागरिकांची नावे व मोबाइल नंबर घेतले. नुकसानीचे पंचमानेही केले. आठ दिवस झाले तरी नुकसान भरपाई मिळण्याबाबत काहीच ठोस सकारात्मकता या दोन्ही प्रशासनाकडून दर्शविण्यात आलेली आढळत नाही, असे स्थानिक नागरिक सांगत आहेत.
अन्यथा तीव्र आंदोलन
विघ्नहर्ता कॉलनीतील नागरिकांनी अधिकाऱ्यांपुढे तीव्र संताप व्यक्त केला. नाल्यांच्या सीमाभिंती बांधून द्याव्यात, नाला खोलीकरण-स्वच्छता करावी, अनधिकृतपणे नाले वळविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या. दरवर्षी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानंतर अधिकारी येतान अन् केवळ पाहणी करुन विकासकामांच्या गप्पा मारुन घोषणा करुन निघून जातात. त्यानंतर अधिकाऱ्यांना कायमस्वरुपी समस्या सोडविण्याचा विसरच पडतो. आता मात्र अधिकाऱ्यांकडून ठोस कामे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही स्थानिक नागरिकांकडून देण्यात आलेला आहे.