नगर- नगर जिल्ह्यात आपत्कालीन प्रसंगांत 108 मोफत रुग्णवाहिका मदतीला तत्काळ धावून गेल्यामुळे रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळवून देण्याची किमया आपत्कालीन आरोग्य सेवेने साधली आहे.गेल्या पाच वर्षात रस्ते अपघात, विषबाधा, शॉक लागणे, गर्भवतींना प्रसुतीकळा यांसारख्या संकटाच्या काळात 108 ऍम्ब्युलन्सने रुग्णांना मदतीचा हात दिला आहे.विविध प्रकारच्या रुग्णांना वेळेत रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पोहोचवत त्यांना मोलाची साथ दिली आहे.सध्या जिल्हयात सुरु असलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीतही रुग्णांना हॉस्पिटल मध्ये मोफत पोहचवत आहे अशी माहिती जिल्ह्याच्या व्यवस्थापक कांचन बिडवे यांनी दिली.
राजूर येथील मवेशी गावातील रुग्णाला अतिवृष्टी,खडतर रस्त्यावरून पाणी वाहत असतानाही हॉस्पिटल मध्ये पोहचवण्यात आले आहे नाशिक विभागाचे प्रमुख बाळासाहेब कंक्राळे,नगर जिल्ह्याचे व्यवस्थापक कांचन बिडवे, संजय थोरात, पर्यवेक्षक अमोल वाकचौरे,कपिल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली 108 चे ड्रायव्हर, डॉक्टर 24 तास तत्पर सेवा देत असतात पण सध्याचा परिस्थितीत सर्वजण कायम अलर्ट आहेत, ऊन,वारा पाऊस याचा विचार न करता महाराष्ट्र शासन व बीव्हीजी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 108 निशुःल्क ऍम्ब्युलन्स रुग्णसेवा मध्ये जिल्ह्यात 40 ऍम्ब्युलन्स, 102 डॉक्टर, व 98 ड्रायव्हर व स्टाफ अहोरात्र काम करत आहे.
जिल्ह्यात कोठेही अतिवृष्टीत काही दुर्घटना घडल्यास किंवा पेशंटसाठी हॉस्पिटल मध्ये पोहचवण्यासाठी नागरिकांनी 108 सेवेशी संपर्क साधावा राज्यशासन आरोग्य सेवा व भारत विकास ग्रुप सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात’ रुग्णवाहिका 108 ‘ सेवा सुरु केली. महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय सेवेअंतर्गत रुग्णवाहिका कार्यान्वित असून गरजू लोक त्याचा लाभ घेत आहेत.या रुग्णवाहिकेद्वारे रस्ता अपघात, हाणामारी, जळीत रुग्ण, हृदयरोगी, विषबाधा, सर्पदंश, प्रसुती रुग्ण, वीज पडून होणारे अपघात, सर्वसामान्य आजार,आत्महत्या अशा विविध रुग्णांना रुग्णालयापर्यंत वेळेवर पोहोचविण्याचे कसोशीने प्रयत्न केले जातात.त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश येत आहे.