भुलेश्वर -सध्या करोनाच्या थैमानामुळे पुणे व मुंबईमधील नागरिक गावी आली आहेत. पुण्यावरून 119, तर मुंबईवरून 30, नोकरीनिमित्त इतर ठिकाणी असणारे 10, असे 169 जण माळशिरस गावामध्ये दाखल झाले आहेत. तर वाहनचालक असणाऱ्या गुजरातवरून आलेल्या 4 जणांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे.
माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारो डॉ. स्मिता बिराडे व त्यांच्या पथकाने 169 जणांचे विलगीकरण करून त्यांना सर्व माहिती देऊन 14 दिवस आपल्या कुटुंबापासून अलिप्त राहण्यास सांगितले आहे.
करोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून गुरुवारी (दि. 26) माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण गावात ग्रामपंचायतीने सोडियम हायपोक्लोराइड फवारणी केली आहे. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी मुनीर शेख, गालिब शेख, बालाजी बोरावके आरोग्यसेविका योगिता टिळेकर, आरोग्यसेवक सदाशिव कवितके यांनी गावात विविध विभागामध्ये फवारणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने गावातील मंदिरे, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, किराणा दुकान अशा ठिकाणी फवारणी करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंडप, मास्क, व सॅनिटायझर दिले आहे. इतर सर्व सुविधा देण्यास ग्रामपंचायत प्रशासन तयार आहे. आपल्या परिसरात बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, पोलीस पाटील यांना कळवावी.
– महादेव बोरावके, सरपंच, माळशिरस.