नाशिक – लग्नासाठी सुरतकडे जाणाऱ्या बसची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसल्याने बसमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. हा अपघात गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात वालोदजवळ व्यारा-बाजीपुरा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे झाला आहे. मृत्यू पावलेले सर्वजण मालेगाव येथील असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावच्या हजार खोली भागातील वऱ्हाडाची बस लग्नासाठी सुरतकडे निघाली होती. भरधाव लक्झरी बस रस्त्यावर उभ्या ट्रकला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण घडला की, यात बस अर्धी कापली गेली आहे. यात मालेगावच्या चौघांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
अपघाताची माहिती मिळताच वालोद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना शासकीय व खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मयत व जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. गेल्या काही दिवसांमध्ये सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. प्रत्येकाने वाहन चालवत असताना काळजी घेणे गरजेचे आहे.