जयपूर – राजस्थानमध्ये राजकीय वादळाने नवे वळण घेतले आहे. सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आता काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. 10 जनपथमधून बाहेर पडल्यानंतर गेहलोत खूपच निराश दिसत होते. सुमारे दीड तास त्यांनी सोनिया गांधींसमोर राजस्थानमधील घडामोडींवर खुलासा मांडला.
बैठकीनंतर बाहेर पडल्यावर गेहलोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो आहे. मी नेहमीच एक निष्ठावान सैनिक म्हणून काम केले आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या दिवशी घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. मला मुख्यमंत्रीपदी राहायचे होते, म्हणून मी त्यांची माफी मागितली.
गेहलोत यांच्या भविष्यातील शक्यता काय?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणातात की, ‘अशोक गेहलोत यांना आता कळले आहे की राजस्थानमध्ये जे काही घडले त्यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा आणि पक्षातील स्थान कमी झाली आहे. अशा स्थितीत गेहलोत आता त्यांचे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतील. गेहलोत यांच्याकडे फक्त चार पर्याय शिल्लक आहेत.
1 राजीनामा देऊन सचिन पायलट यांना पाठिंबा द्यावा लागणार –
अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर ज्या पद्धतीने वक्तव्य केले त्यावरून राजस्थानमध्ये आता काहीतरी मोठे घडू शकते हे स्पष्ट होत आहे. अशोक गेहलोत यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद सोडावे आणि सचिन पायलटला पाठिंबा द्यावा, अशी शक्यता आहे. पायलट यांना मुख्यमंत्री करून ते त्यांच्या जवळच्या आमदाराला उपमुख्यमंत्री बनवू शकतात. याशिवाय पायलट आणि स्वतः वाद संपवण्याचा प्रयत्न करू शकतात. दोन्ही पक्षांना सोबत घेऊन बैठक घेऊन सर्व मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
2. संघटनेत जबाबदारी पार पाडू शकतात –
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेहलोत पुन्हा संघटनेत येऊ शकतात. गेहलोत यांच्या चुका माफ करून काँग्रेस हायकमांडने त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही गटातील आमदारही शांत होतील.
3. गेहलोत यांना मुख्यमंत्री राहू दिले जाणार-
सध्या काँग्रेसचे आमदार दोन गटात विभागले गेले आहेत. गेहलोत यांच्या सूचनेनंतरही आमदार राजी झाले नाहीत, तर अशा परिस्थितीत अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदी राहण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यांची जबाबदारीही निश्चित करून सचिन पायलटला केंद्राच्या राजकारणात बोलावले जाईल.
4. गेहलोत-पायलट व्यतिरिक्त तिसर्याला मुख्यमंत्री करण्याची शक्यता –
दोघांमधील वाद मिटला नाही, तर तिसर्याला राजस्थानचे मुख्यमंत्री केले जाण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर पायलट आणि गेहलोत यांच्यापैकी एकाला प्रदेशाध्यक्ष, तर दुसऱ्याला राष्ट्रीय राजकारणात बोलावले जाईल.
आत्तापर्यंत काय झाले?
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे नवे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत, अशी काँग्रेस हायकमांडची इच्छा होती. त्यासाठी गेहलोत यांच्याऐवजी दुसऱ्याला राजस्थानचे मुख्यमंत्री बनवले जाणार होते. त्यासाठी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वीच राज्यात गदारोळ झाला. गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. हायकमांडने पाठवलेल्या निरीक्षकांच्या बैठकीलाही या आमदारांनी हजेरी लावली नाही आणि वेगळी बैठक घेतली. या गदारोळामुळे गेहलोत यांचा दावा धोक्यात आला होता. दोन दिवसांच्या वादानंतर मंगळवारी अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधींशी फोनवर बोलून त्यानंतर गुरुवारी भेट घेऊन माफी मागितली.
दुसरीकडे, काँग्रेस हायकमांडने राजस्थानचे तीन काँग्रेस नेते महेश जोशी, शांती धारिवाल आणि धर्मेंद्र राठोड यांना निरीक्षकांच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने आणि प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्ये केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तिघेही गेहलोत गटाचे आहेत. या सगळ्यामध्ये सचिन पायलटही दोन दिवस दिल्लीत हजर होते. मात्र, ते कोणत्याही विषयावर बोलले नाहीत.