आश्वासनानंतर आंदोलन मागे
बोंडारवाडी धरण कृती समितीने कण्हेरचे पाणी अडविण्याचा दिला इशारा
मेढा – 54 गावांच्या पाण्याचा प्रश्न असलेल्या बोंडारवाडी धरणाचे आश्वासन देऊनही “ट्रायलपीट’चे काम सुरू न केल्याने सोमवारी मेढा (ता. जावळी) येथे बोंडारवाडी धरण कृती समितीचे अध्यक्ष विजयराव मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या “चक्का जाम’ आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी सातारा- महाबळेश्वर रस्त्यावरील वाहतूक तब्बल चार तास अडवून ठेवली.
अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी या महिन्यात “ट्रायलपीट’च्या कामाला सुरुवात करू, हे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यानंतर “ट्रायलपीट’च्या कामाला सुरुवात करा अन्यथा कण्हेर कालव्याचे पाणी अडवू, असे निवेदन तहसीलदार शरद पाटील यांच्याकडेही दिले आहे. या वेळी बोंडारवाडी धरण कृती समितीचे अध्यक्ष विजयराव मोकाशी म्हणाले, “बोंडारवाडी धरणास प्रशासकीय मान्यता मिळूनदेखील जलसंपदा विभाग “ट्रायलपिट’ घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे.
लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा करूनदेखील तसेच धरण कृती समितीकडूनही पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन ना. शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. परंतु, सर्वे करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी बोंडारवाडी गावातील ग्रामस्थांची धास्ती घेऊन सर्वेचे काम बंद केले. मात्र, एका गावातील ग्रामस्थांच्या विरोधासमोर नांगी टाकलेल्या प्रशासनाला 54 गावांतील ग्रामस्थांचा उद्रेक काय असतो, हे आजच्या आंदोलनातून दाखवून दिले.’
आ. शिवेंद्रराजेंचाही सहभाग
मेढा येथील बाजार चौकामध्ये पुकारलेल्या “चक्का जाम’ आंदोलनात सातारा- जावळीचे आमदार शिवेन्द्रसिंहराजे भोसले, माजी आमदार सदाशिव सपकाळ, अमित कदम, विलासबाबा जवळ, आदिनाथ ओंबळे, बापूराव पार्टे, बजरंग चौधरी यांच्यासहित शेकडो महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक उपस्थित होते. तर सोमवारी आठवडी बाजारादिवशी “चक्का जाम’ झाल्याने भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहक व व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली.