बीड – बीडमधील जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरणी आणखी चार जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन निवृत्त अधिकाऱ्यांसह दोन कृषी सहाय्यकांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार घोटाळ्यात मागच्या महिन्यामध्ये कृषी विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा चार जणांना परळी पोलिसांनी अटक केली आहे.
शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे आणि अमोल कराड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापैकी शिवाजी हजारे आणि विजयकुमार भताने हे दोघेजण निवृत्त तालुका कृषी अधिकारी आहेत. तर कराड आणि जंगमे हे सध्या कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.
2018 मध्ये जलयुक्त शिवारच्या कामामध्ये घोटाळा झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी मागच्या महिन्यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली होती. तसेच कंत्राटदारांकडे अडकलेल्या 90 लाख रुपयांची रिकव्हरी करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते.
बीड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील संस्था आणि अधिकाऱ्यांना 90 लाख रुपये वसूल करण्याचे औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकानी आदेश दिले होते. या आदेशा सोबतच पोलिसांनी सुद्धा अटकेची कारवाई सुरु केली आहे.