भिगवण – अरबी सागरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या शिवस्मारकाच्य उभारणीचा खर्च तीन हजार कोटींवरून आता तीस हजार कोटींकडे जाईल. स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांत किल्लेसंवर्धनावर अवघा चौदा-पंधरा कोटींचा निधी खर्च झाला. शासनाने त्याऐवजी गडकिल्यांच्या संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे, असे प्रतिपादन माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा भिगवण संचलित छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाचे वतीने शिवजयंती निमित्त आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भिगवण ग्रामपंचायतच्या सरपंच दीपिका क्षीरसागर, प्रमुख अतिथी म्हणून मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे व व्याख्यानमालेतील प्रमुख वक्ते म्हणून अमरावतीचे सोपान कणेरकर, कर्मयोगीचे संचालक पराग जाधव, नारायण पवार, डॉ. अजय थोरात यावेळी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी राजे म्हणाले, अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य केलं; मात्र त्यांच्या कार्याची दखल घ्यायला सरकारला वेळ मिळत नाही. ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्यभिषेक झाला तसेच छत्रपती शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले.
तेथील स्मृती सुद्धा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. आम्हाला परवानगी द्या जर सरकार तयार नसेल तर आपण सर्वसामान्यांच्या सहाय्याने किल्ले संवर्धन करु. शेकडो पत्रे लिहुन सुद्धा असेच टाळणार असाल तर प्रसंगी मोठ आव्हान उभे करू. यावेळी नीट परीक्षेत यश मिळालेल्या मानसी गलांडे, सिद्धी बरबडे आणि यश केमदरे यांचा सत्कार करण्यात आला.