पुणे – माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बेकायदेशीर निवडणुकांविरुद्ध गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला असून हे उपोषण साखळी पद्धतीने सुरू होणार आहे. अनेकांनी एमसीएफ विरोधातील आंदोलनात उडी घेतली आहे. पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे चेअरमन विजय प्रकाश ढेरे यांनी साखळी उपोषणाची सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची कार्यकारिणीच चुकीची आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च न्यायालय नियुक्त समितीने त्यांची 2019 ते 2022 या कालावधीसाठी झालेली निवडणूक रद्दबातल ठरवली आहे. यानंतरही संघटनेचे पदाधिकारी चेंज रिपोर्ट बदलून निवडणूक घटनेनुसार असल्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे वाल्हेकर म्हणाले.
या विरोध वाल्हेकर हे मागील सात दिवसांपासून आमरण उपोषण करीत होते. त्यांना माजी रणजीपटू सुभाष रांजणे, मिलिंद गुंजाळ, महाराष्ट्राचे माजी कर्णधार शंतनु सुगवेकर, रॅन्डॉल्फ डॅनियल, राहुल कानडे, प्रसाद कानडे, रणजित खिरिड, श्रीकांत काटे, युवराज कदम, पूना क्लबचे पदाधिकारी अभिषेक बोके, नितीन कोकाटे, स्टेडियम क्लबचे संस्थापक भारत मारवाडी, आनंद केदारी यांच्यासह राज्यभरातील आजी-माजी खेळाडूंनी पाठिंबा दर्शविला आहे.
खेळाडूंमध्येही केला जातो दुजाभाव
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या संघ निवडीत खेळाडूंबाबतही कसा दुजाभाव केला जातो, हेदेखील निदर्शनास आणून दिले गेले आहे. अश्विनीकुमार जोशी यांनी पत्र लिहून संघनिवडीबाबत आक्षेप नोंदविला आहे. एमसीएकडून महाराष्ट्रातील प्रतिभावान क्रिकेटपटूंवर अन्याय होत आहे. आगामी विजय मर्चंट, रणजी करंडक, 25 वर्षांखालील स्पर्धांसाठी तरी एमसीएकडून पारदर्शकपणे संघ निवड होईल का मुद्दा आहे. निवडणुकीच्या गैरकारभाराबाबत वाल्हेकर यांनी उभारलेल्या लढ्याला माझा पाठिंबा आहे, असेही जोशी यांनी सांगितले आहे.