मनिला, (फिलीपाईन्स) – काही दिवसांपूर्वी फिलीपाईन्समध्ये आलेल्या राय वादळात मरण पावलेल्यांची संख्या 400 वर पोहोचली आहे. वादळाचा तडाखा बसलेल्या भागात आता रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. वादळादरम्यान बेपत्ता झालेल्यांपैकी अजूनही 60 जण बेपत्ता आहेत. असे मनिलातील संरक्षण कार्यालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे.
संपूर्ण फिलीपाईन्समधील एकूण 4 लाख 80 हजार घरे वादळामुळे पडली आहेत किंवा नंतर आलेल्या पूरामध्ये वाहून गेली आहेत. त्यामुळे बेघर झालेल्यांची संख्या खूप मोठी आहे. सुमारे 3 लाख लोक अजूनही आश्रय छावण्यांमध्ये रहात आहेत. राय वादळामुळे फिलीपाईन्समध्ये अंदाजे 410 दशलक्ष डॉलरचे नुकसान झाले आहे. वादळ आणि नंतर आलेल्या पूरामुळे आता फिलीपाईन्समध्ये रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दक्षिणेकडील दिंगट या बेटावर गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. आतापर्यत 80 जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय दूषित पाण्यामुळे अतिसाराचा संसर्गही व्हायला लागला आहे. या वादळामुळे करोना प्रतिबंधक लसींचे 4 हजार डोस नष्ट झाले आहेत, तर रुग्णालयांचेही मोठे नुकसान झाले आहे.
फिलीपाईन्समध्ये दरवर्षी 20 वादळे येत असतात. यातील सुपर टायफून हयान हे आतापर्यंतचे सर्वाधिक घातक वादळ होते. 2013 साली आलेल्या या वादळात 7,300 जणांचा मृत्यू झाला होता.