कर्जत : राज्यातून भाजपची सत्ता गेल्यानंतर रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण काही दिवस रायगडच्या राजकारणातून गायब होते; मात्र महिनाभरात त्यांनी पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणात सक्रिय भाग घेण्याचे ठरविल्याचे दिसून येत आहे. सोमवारी दुपारी कर्जतचा दौरा त्यांनी केला. त्याप्रसंगी पत्रकार परिषद घेण्यात आली.
गेल्या आठवड्यात त्यांनी रोहा दौरा तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकांचा पक्षप्रवेश भाजपात करून घेणे यामध्ये माजी पालकमंत्री रवींद चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याप्रमाणे सोमवारी त्यांनी कर्जत येथे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच पत्रकार परिषदेमध्ये चव्हाण यांना विचारलेल्या प्रश्नमध्ये कर्जत नगरपरिषद निवडणुकीत आम्ही कर्जतच्या विकासासाठी एकत्र आलो होतो, असे त्यांनी जाहीर केले.
पाली भूतीवली धरण प्रकल्प पाहणी करून आपण हा प्रश्न सोडणार असल्याचे असे जाहीर करून टाकले तसेच कर्जतमध्ये सर्व सरकारी कार्यालय आपण पालकमंत्री असतानाच केले आहे, त्यामुळे अन्य राजकीय नेत्याने श्रेय घेऊ नये असा टोला त्यांनी लगावला, तसेच कर्जत मतदारसंघांमध्ये भविष्यात भाजपचा आमदार असेल, असे सुद्धा त्यांनी संकेत दिलेत, त्यामुळे रायगडच्या राजकारणात रवींद्र चव्हाण पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.