नवी दिल्ली – करोनाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने उत्तम कामगिरी केली आहे. भारताकडे परकीय चलन साठा असल्यामुळे भारताच्या आयातीवर कसलाही परिणाम झाला नाही. त्याचबरोबर इतर देशांच्या तुलनेने देशातील उत्पादकता जास्त प्रमाणात राहिली.
आगामी काळातही परदेशातील घडामोडीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी म्हटले आहे.
करोनाच्या काळात विविध देशांनी मोठ्या प्रमाणात भांडवल सुलभता निर्माण केली होती. त्याचबरोबर व्याजदरात कपात केली होती. आता या सवलती बंद होणार असल्यामुळे महागाई वाढणार आहे. जागतिक बाजारात भांडवल सुलभतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये जागतिक व्यापारावर परिणाम संभवतो. मात्र भारताकडे मोठ्या प्रमाणात परकीय चलन साठा असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि आयातीवर किंवा निर्यातीवर फारसा परिणाम होणार नाही असे सुब्बाराव म्हणाले.
क्रिसील या पतमानांकन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले की, परकीय घडामोडीपासून भारत पूर्णत: अलिप्त राहू शकत नाही. मात्र 1990 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर जसा परिणाम झाला तसा परिणाम यावेळी होणार नाही. भारताकडे सध्या तब्बल 637 अब्ज डॉलर इतका परकीय चलनाचा साठा आहे.
माहिती तंत्रज्ञान आणि दागीने क्षेत्रातून निर्यात वाढत आहे. त्याचबरोबर कृषी उत्पादनांची निर्यात वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात परकीय चलनाचा ओघ भारतामध्ये कायम राहणार आहे. परदेशातील सवलती कमी झाल्यानंतर भारतातील परकीय चलन काही प्रमाणात परदेशात जाऊ शकते. मात्र भारताकडे असलेल्या परकीय चलनाच्या साठ्याच्या माध्यमातून रिझर्व बॅंक चलन पातळीवर स्थिरता कायम ठेवू शकेल असे ते म्हणाले