नवी दिल्ली – लॉक डाऊनच्या काळात स्थूल अर्थव्यवस्था हाताळणे अवघड काम होते. मात्र रिझर्व्ह बॅंकेने या काळात उत्तम कामगिरी करून अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यात यश मिळविले आहे, असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी सांगितले.
भारतीय उद्योग महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना सुब्बाराव म्हणाले की, रिझर्व्ह बॅंकेला या काळात अनेक आघाड्यावर काम करावे लागले. एकिकडे आर्थिक स्थिरता कायम ठेवणे आणि दुसरीकडे उत्पादक क्षेत्रांना भांडवल पुरवठा करणे महत्त्वाचे होते. या दोन्ही आघाड्यावर रिझर्व्ह बॅंक यशस्वी झाली आहे.
इतर देशातील रिझर्व्ह बॅंकांनी अतिरिक्त भांडवल सुलभतेकडे लक्ष दिले. मात्र भारतीय रिझर्व्ह बॅंकेने हे भांडवल उत्पादक क्षेत्रांना जाईल ह्याची काळजी घेतली. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत राहिली. आणि आता विकासदर अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या यशामध्ये रिझर्व्ह बॅंकेचा मोठा वाटा आहे. अतिरिक्त भांडवलामुळे महागाई वाढण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता रिझर्व्ह बॅंकेला व्याजदरात कपात करण्यास कमी वाव आहे, असे त्यांनी सांगितले. आता केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने महागाई रोखून वित्तीय तूट कमी ठेवण्याच्या मुद्याकडे लक्ष ठेवण्याची गरज असल्याचा सल्ला त्यांनी दिला.