कोलकाता – भारतात डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात नोटांचा वापर कमी होईल असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी म्हटले आहे. नोटबंदीनंतर नोटांचा वापर हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. मात्र लॉक डाऊनच्या काळामध्ये डिजिटल व्यवहार होतील की नाही या शंकेमुळे लोकांनी जास्त नोटा बाळगल्या होत्या. आता त्याचे प्रमाण कमी होईल असे मत त्यांनी राष्ट्रीय शेअर बाजाराने या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
क्रिप्टोकरन्सी या विषयावर सुब्बाराव यांनी आपले मत पुन्हा व्यक्त केले. भारतामध्ये क्रिप्टो करन्सीला परवानगी दिल्यास रिझर्व बॅंकेचे पतधोरणावरील नियंत्रण कमी होईल असा इशारा त्यांनी दिला. रिझर्व बॅंक पैशाचा पुरवठा नियंत्रित करते. त्याचबरोबर महागाई नियंत्रित करण्यासाठी चलन धोरण जाहीर करीत असते. मात्र जर क्रिप्टोकरन्सी आल्या तर त्याला पर्यायी करन्सीचे स्वरूप येईल. ते तंत्रज्ञान नवीन असल्यामुळे त्यावर कसे नियंत्रण करायचे याचा अंदाज कोणाला आलेला नाही.
क्रिप्टोचे व्यवहार अल्गॉरीदमवर आधारित असतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण करणे अवघड जाते. रिझर्व बॅंकेकडे पैशाचा पुरवठा करण्याचे नियंत्रण असण्याची गरज आहे. रिझर्व्ह बॅंकेने स्वतःची डिजीटल करन्सी निर्माण केली तरी परिस्थितीत फारसा फरक पडणार नसल्याचे त्यांना वाटते.
क्रिप्टोवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा किंवा नियामक चौकट घालून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी करत आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देखील क्रिप्टो एक मोठा बुडबुडा असल्याचे विधान केले होते. सध्या सहा हजारांहून अधिक क्रिप्टो चलन असून त्यापैकी बहुतांश येत्या काळात निकालात निघतील. अगदी एक, दोन किंवा बोटांवर मोजण्याइतकेच चलन तग धरू शकतील, असेही राजन म्हणाले होते.