नवी दिल्ली – केंद्र सरकारने तेलावरील आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. त्यामुळे खाद्य तेल 15 ते 20 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता खुली झाली आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होईल याकडे खाद्य तेल उत्पादन करणाऱ्या राज्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. गेल्या बुधवारी केंद्र सरकारने कच्च्या खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केले. त्याचबरोबर तयार खाद्य तेलावरील शुल्कही कमी केले आहे.
यामुळे खाद्यतेल ग्राहकांसाठी 15 ते 20 रुपयांनी कमी होणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणा याची योग्य अंमलबजावणी करतील याची काळजी घ्यावी असे केंद्र सरकारने आठ राज्यांना सांगितले आहे. ज्या प्रमाणात शुल्क कमी केले आहे त्या प्रमाणात ग्राहकांना फायदा झाला पाहिजे, असे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने राज्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
ज्या राज्यांना पत्र पाठविले आहे, त्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाचा समावेश आह. भारतामध्ये तेलाचे उत्पादन कमी झाले आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षांमध्ये भारतामध्ये खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये 50 टक्क्यांची वाढ झाली आहे.
आगामी काळामध्ये भारतामध्ये सण येणार असल्यामुळे खाद्यतेल स्वस्तात मिळावे अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. यासाठी केंद्र सरकारने या उपाययोजना केल्या आहेत. खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर एकुणच अन्नधान्याची महागाई कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा अन्न मंत्रालयाने व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने विविध शुल्कात केलेली कपात 31 मार्च 2022 पर्यंत अंमलात राहणार आहे.