संतोष पवार
सातारा – जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल 21 डिसेंबर रोजी संपत असून नवीन पदाधिकारी निवडीचेही वेध अनेकांना लागले आहेत. कार्यकाल संपण्यापूर्वी म्हणजे 20 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेत विविध विभागांचा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात येणार आहे.
विद्यमान पदाधिकाऱ्यांची ही शेवटचीच सभा असल्याने पदाधिकाऱ्यांची धावपळ होत आहे. दरम्यान विद्यमान पदाधिकाऱ्यांची ही शेवटचीच सभा असून लवकरच नूतन पदाधिकाऱ्यांची निवड होणार असल्याने या सभेत इच्छुक उमेदवार जोरदार लॉबिंग करण्याचे संकेत आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये पहिल्या अडीच वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून संजीवराजे निंबाळकर, उपाध्यक्षपदी वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापतीपदी राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापतीपदी शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापतीपदी वनिता गोरे यांना संधी मिळाली होती. अध्यक्ष संजीवराजे यांनी विरोधी सदस्यांनाही विश्वासात घेवून जिल्हा परिषदेत सामंजस्याचे वातावरण निर्माण केले होते. पदाधिकारी, अधिकारी यांनी हातात हात घालून काम केल्यास काय विकास होतो याचा प्रत्यय या अडीच वर्षात आला होता.
पदाधिकारी, सदस्यांचे चांगले सहकार्य मिळत असल्याने अधिकाऱ्यांनी पण मन लावून काम केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना निवडणूक आचारसंहितेमुळे मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत 21 डिसेंबर रोजी संपत आहे. आता नव्या पदाधिकाऱ्यांची निवड 21 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत होणार असल्याचे पत्र प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी काढले आहे. या पार्श्वभूमीवर 20 डिसेंबरला होणाऱ्या विशेष सभेकडे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे विविध विभागांचा विकास आराखडा अद्याप मंजूर झाला नव्हता. हा आराखडा मंजूर करुन जिल्हा नियोजन समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवायचा असल्याने विशेष सभा 20 डिसेंबर रोजी होत आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांची ही शेवटची सभा असल्याने पदाधिकाऱ्यांची चांगलीच धापवळ उडाली आहे. आपल्या भागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी, आराखड्यात घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरु आहे. विकास आराखडे बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शुक्रवारी होणाऱ्या विशेष सभेत जिल्ह्याच्या अनुषंगाने आणखी कोणता महत्वाचा निर्णय होणार? याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतिपदांसाठी रस्सीखेच
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने विद्यमान अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, मानसिंगराव जगदाळे, राजेश पवार, मनोज पवार, सुरेंद्र गुदगे यांची नावे आघाडीवर आहेत. संजीवराजे यांनी सत्ताधारी, विरोधी सदस्यांना एकत्र ठेवत स्वच्छ व पारदर्शक कारभार केला आहे. याशिवाय फलटण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आ. दीपक चव्हाण यांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी संजीवराजे यांना पुन्हा संधी देवू शकतात. मसूरचे मानसिंगराव जगदाळे यांना मागील निवडीवेळी थांबवण्यात आले होते, त्यामुळे त्यांचाही नावाचा विचार होऊ शकतो.
पाटण तालुक्यात विक्रमसिंह पाटणकर गटाला ताकद देण्यासाठी राजेश पवार यांना बढती देवून अध्यक्षपद दिले जाऊ शकते. कृषी सभापती मनोज पवार यांनाही बढतीचे संकेत असून ऐनवेळी सुरेंद्र गुदगे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब होऊ शकते. एकंदर जिल्ह्यात राष्ट्रवादी जिथे कमी असेल तिथे ताकद देण्याचे काम पक्षाकडून होणार असल्याचे वृत्त आहे. उपाध्यक्षपदासाठी दीपक पवार यांचे नाव आघाडीवर असून सभापतीपदासाठीही मोठी रस्खीखेच आहे.