पुणे: आॅक्टोबर १९४७ मध्ये तत्कालीन जम्मू आणि काश्मीर संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर सुमारे ७२ वर्षांनंतर तेथे नियुक्त झालेल्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी प्रथमच भारतीय संविधानानुसार शपथ घेतली. न्या. रजनीश ओसवाल असे त्यांचे नाव असून जम्मू व काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यामूर्ती गीता मित्तल यांनी पद व गोपनीयतेची शपथ त्यांना दिली. त्यामुळे न्या. रजनीश ओसवाल हे जम्मू व काश्मीर राज्याचे तसेच लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या उच्च न्यायालयाचे भारतीय संविधानानुसार शपथ घेतलेले प्रथम न्यायमूर्ती ठरले आहेत.
विलिनीकरणाच्या अटींनुसार जरी भारताचा भाग झाले असले तरी जम्मू काश्मीरसाठी विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० भरतीय संविधानामध्ये अंतर्भूत केलेले होते. त्यातील तरतूदीनुसार जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र संविधान बनविले होते. तेथील राज्यप्रमुख (गव्हर्नर) हे १९६५ पर्यंत सदर-ए-रियासत म्हणवले जायचे व जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री हे त्या प्रांताचे पंतप्रधान समजले जायचे. तसेच तेथील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना जम्मू काश्मीरच्या स्वतंत्र संविधानास अनुसरून शपथ दिली जात असे.
भारत सरकारने २०१९ मध्ये २७२ वी घटनादुरूस्ती करून जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे अनुच्छेद ३७० भारतीय संविधानातून काढून टाकले. त्यानुसार ५ आॅगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपतींनी या घटनादुरूस्तीस मान्यता दिल्याने जम्मू काश्मीरच्या स्वतंत्र संविधानाचा अंमल रद्द झाला. तेंव्हपासून भारतीय संविधान व त्या अंतर्गत इतर भारतीय कायद्यांचा अंमल जम्मू काश्मीरमध्ये इतर राज्यांप्रमाणे लागू झाला.
विधिज्ञ रजनीश ओसवाल यांना तेथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शिफारस करण्याची प्रक्रिया यावर्षीच्या जानेवारी महिन्यात पूर्ण झाली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यास मान्यता दिल्यावर न्या. रजनीश ओसवाल यांना जम्मू व काश्मीर तसेच केंद्रशासित लडाखच्या संयुक्त उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून भारतीय संविधाननुसार गुरूवार दोन एप्रिल रोजी शपथ देण्यात आली.
—————————————
संस्मरणीय घटना
जम्मू काश्मिर उच्च न्यायालयात भारतीय संविधानानुसार न्यायमूर्तींनी शपथ घेणे ही संस्मरणीय घटना आहे. पूर्ण स्वरूपात भारतीय संविधानाच्या तरतूदी तेथे लागू झाल्यानंतर तेथील न्यायमुर्तींचा भारतीय संविधानास अनुसरून प्रथमच शपथविधी होणे ही तेथील न्यायक्षेत्राला भारतीय संघराज्याच्या अखंडत्वाची ग्वाही देणारी बाब आहे.
ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार
माजी उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन