नवी दिल्ली – 38 वर्षांपुर्वी तिहार कारागृहात 1982 साली रंगा आणि बिल्ला या कुख्यात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली होती. त्यांच्यावरही निर्भया प्रकरणातील आरोपींसारखेच गुन्हे होते. त्यांच्या फाशी नंतर अशाच स्वरूपातील गुन्हेगारांना तिहार मध्ये झालेली ही पहिली फाशी आहे.
निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशी नंतर रंगा-बिल्ला प्रकरणातील स्मृतींना पुन्हा उजाळा मिळाला. 1978 साली कुख्यात गुन्हेगारांच्या दुकलीने एका भावंडाचे अपहरण केले होते. दिल्लीतच खंडणीसाठी हे अपहरण झाले. पण ज्या गीता आणि संजय चोप्रा भावंडांचे त्यांनी अपहरण केले होते त्यांचे वडिल नौदलाचे अधिकारी आहेत हे लक्षात आल्यानंतर या दोन्ही आरोपींनी या भावंडांची अत्याचार करून हत्या केली. हत्येपुर्वी त्यांनी गीता चोप्रा हिच्यावर बलात्कारही केल्याचे उघड झाले होते.
या प्रकरणात कुलजीतसिंग उर्फ रंग आणि जसबीरसिंग उर्फ बिल्ला यांना फाशीची शिक्षा झाली. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांना चार वर्षांनी प्रत्यक्षात तिहार मध्ये फाशी दिली गेली. या रंगा-बिल्ला जोडीची आजही अनेक बाबतीत उपमा दिली जाते. या दोघांना फाशी देण्यासाठी फरीदकोट येथून फकीरा नावाच्या जल्लादाला तर मीरत मधून कालू नावाच्या जल्लादाला फाशी देण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.