पहिला टप्प्यातील रक्कम उपलब्ध : कारकुंडीतील शेतकऱ्यांपासून झाला श्रीगणेशा
राजगुरूनगर- खेड तालुक्यात अवकाळी पावसाने 35 हजार 389 शेतकऱ्यांचे 12 हजार 164 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1 कोटी 60 लाख 98 हजार रुपये नुकसानभरपाईची रक्कम उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा कारण्यास सुरुवात झाल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली. दरम्यान, जुलै, ऑगस्टमध्ये अतिवृष्टिमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शासनाकडून फळबाग क्षेत्रासाठी हेक्टरी 18 हजार तर इतर पिकांसाठी हेक्टरी 8 हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. त्याअगोदर झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील 6 हजार 497 शेतकऱ्यांच्या 2134 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. तालुक्यात 44 हजार 416 हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी खरीप हंगामात केली होती. तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठिवण्यात आला होता. त्यानुसार 1 कोटी 60 लाख 98 हजारांची मदत खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळाली आहे. या मदतीच्या वाटपाची सुरुवात तालुक्यातील कारकुंडी गावापासून सुरू केली असून सोमवार (दि. 25) कारकुंडी गावातील 144 शेतकऱ्यांना 10.78 हेक्टर क्षेत्रातील नुकसानी बद्दल 88 हजार 280 रुपये त्याच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आली आहे.