2 विमाने मुंबईकडे वळवण्याची वेळ
पुणे – गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या सुमारास पडत असलेल्या दाट धुक्याचा परिणाम विमानसेवेवर होत आहे. शनिवार (दि.9) बंगळुरू आणि चेन्नईवरुन पुण्याकडे येणारी दोन विमाने मुंबईकडे वळवण्यात आली. तसेच, काही विमानांचे उड्डाण उशिरा झाल्याने प्रवाशांची गर्दी झाली होती.
शहरात पहाटेच्या सुमारास पडलेल्या दाट धुक्यामुळे समोरील काही अंतरावरील दिसेनासे होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही उड्डाणे उशिरा केली जात आहेत. तर, इतर ठिकाणाहून येणाऱ्या काही विमाने वळविण्यात आली. दिल्ली-पुणे या मार्गावरील उड्डाणे तीन ते चार तासांच्या विलंबाने केली जात होती. शनिवारी चेन्नई व बंगळुरूवरुन पुणे विमानतळावर येणारी विमाने धुक्यामुळे मुंबईकडे वळविण्यात आली होती. त्यानंतर धुक्याची तीव्रता कमी झाल्यानंतर ही विमाने दहा वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर दाखल झाली. याचबरोबर, बंगळुरू, नागपूर, दिल्लीकडे जाणाऱ्या विमानांचे उशिरा उड्डाण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.