अहमदनगर – राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी आज पुणतांबा येथे येऊन तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेतून समाधानकारक तोडगा निघाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. येथील शेतकऱ्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या राज्य सरकारच्या विविध विभागांशी संबंधित आहेत.
त्यामुळे संबंधीत विभागांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासाठी 7 जून रोजी मुंबईत चर्चा केली जाणार आहे, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. या चर्चेचे निमंत्रण स्वीकारून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता या आंदोलनाविषयी मंगळवारच्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाईल असे त्या गावचे सरपंच डॉ. धनंजय आवटे यांनी सांगितले.
पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी शिल्लक उस आणि अन्य प्रश्नांच्या संबंधात 1 जून पासून येथे धरणे आंदोलन सुरू केले होते. 5 जून पर्यंत हे आंदोलन केले जाणार होते पण आज चौथ्या दिवशीच कृषी मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे.
या संबंधात कृषिमंत्र्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संबंधात सरकार सकारात्मक आहे. या मागण्यांविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल आणि अन्य मागण्यांच्या संबंधात केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.