जीवनात प्रत्येकाचे काही ना काही ध्येय असते. जे ध्येय प्रत्येकाने आपल्यातील गुण, कौशल्ये आणि क्षमताना ओळखून आखलेले असते. त्या ध्येयाच्या दिशेने प्रत्येकजण वाटचाल करीत असतो. परंतु अनेकदा आखलेली ध्येये ही नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे पूर्ण होण्याआधीच संपून जातात. अनेकदा ठरविलेले ध्येय आपण पूर्णत्वास नेऊ शकत नाही. अगदी विचारपूर्वक आणि दृढ निश्चय करूनही आपल्याला अपेक्षित ध्येयप्राप्ती साध्य करता येत नाही. असे का बरं होत असावे? ध्येयाच्या दिशेने प्रवास करताना असे काय होते ज्याने त्या प्रवासातून अर्ध्यातूनच माघारी यावे लागते? याचे उत्तर अगदी सोपे आहे आणि ते म्हणजे आपल्या ध्येयाप्रती आपल्यात असणारा एकाग्रतेचा अभाव. एकाग्रता किंवा फोकस ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त करीत असते. केवळ ध्येयच नाही तर कोणतेही काम करताना जर एकाग्रता नसेल तर ते कार्य अपेक्षित वेळेत पूर्णत्वाकडे नेता येत नाही.
गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांची धनुर्विद्येची परीक्षा घ्यायचे ठरविले. समोर झाडावर असलेल्या पक्ष्याच्या डोळ्यावर निशाणा ठेवण्यास सांगितले. यावर आपल्या शिष्यांना विचारले, तुम्हाला समोर काय दिसते आहे. कुणी झाड दिसते आहे सांगितले, कुणी चिमणी सांगितली तर कुणी आजूबाजूच्या इतर दिसणाऱ्या गोष्टी सांगितल्या. परंतु एक शिष्य होता जो बोलला, मला फक्त त्या पक्ष्याचा डोळा दिसतोय. द्रोणाचार्यांच्या या परीक्षेत तो विद्यार्थी उत्तीर्ण झाला. कारण त्याला फक्त त्याचे लक्ष्य दिसत होते. आपल्या लक्ष्यावर त्याची कमालीची एकाग्रता होती. तो शिष्य म्हणजे महाभारताचा नायक निष्णात धनुर्धारी अर्जुन. आपण ही कथा पुस्तकांत वाचली आहे. शाळेत शिकलोही आहे. ही कथाच आपल्याला आपल्या ध्येयावर,कामावर एकाग्रचित्ताने लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा देते. रस्त्यावर वाहतुकीचे संदेश असलेल्या फलकांवर लिहिलेले असते की नजर हटी समझो दुर्घटना घटी. आपली आपल्या ध्येयावरून नजर हटली की समजाच की नुकसान अटळ आहे.
एकदा एका नामांकित कंपनीत राजू नावाचा एक कर्मचारी काम करीत होता. राजूला दिलेले काम त्याच्याकडून वेळेत पूर्ण होत नसे. एकदा वरिष्ठांनी त्याला बोलवून त्याला कामाबाबत चांगलेच खडे बोल सुनावले. राजूला ही गोष्ट आवडली नाही तो राजीनामा घेऊन वरिष्ठांकडे गेला. वरिष्ठांना म्हणाला, मला तुमच्या कंपनीत काम करायचे नाही.
वरिष्ठांनी विचारले, कारण काय? तो बोलला, आपल्या कंपनीतील आमच्या दोन सीनियर्समध्ये सारखे किरकोळ वाद होत असतात. कर्मचारीही एकमेकांना मागून काहीतरी वाईट बोलत असतात. त्यांच्या या वर्तनामुळे माझे माझ्या कामावर लक्ष लागत नाही. अशा बेशिस्त सीनियर्स बरोबर मला काम करायचे नाही. सर्व प्रकार वरिष्ठांच्या लक्षात आला. वरिष्ठ बोलले, ठीक आहे मी तुझा राजीनामा मंजूर करतो. तत्पूर्वी तुला एक काम करावे लागेल त्यानंतर तूच निर्णय घे. राजूने विचारले, काय करावे लागेल?
वरिष्ठांनी काठोकाठ पाण्याने भरलेला ग्लास त्याच्या हातात दिला आणि त्याला म्हणाले, हा ग्लास घेऊन जाऊन संपूर्ण कंपनीतून एक चक्कर मारून ये. पण लक्षात ठेव या ग्लासातील एक थेंबही खाली सांडता कामा नये. राजूने तो काठोकाठ पाण्याने भरलेला ग्लास घेतला आणि तो सांडू नये याची दक्षता घेत चालू लागला. अर्ध्या तासानंतर तोल सावरत आणि एकही थेंब न सांडता राजू पुन्हा वरिष्ठांकडे आला. राजू वरिष्ठांना म्हणाला, हे पाहा सर पाण्याचा एकही थेंब न सांडता परत आलो आहे.
वरिष्ठ हसले आणि म्हणाले, बरं मग तू आता येताना तुला पुन्हा कुणी कुणाशी भांडताना किंवा वाईट बोलताना आढळले काय? राजू म्हणाला, तो पाण्याचा भरलेला ग्लास सावरायच्या नादात मला काहीही ऐकू आले नाही. वरिष्ठ राजूच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले, तुझे लक्ष फक्त त्या पाण्याच्या ग्लासाकडे होते म्हणून तुला इतरांचे दोष शोधायला वेळच मिळाला नाही. लक्षात ठेव आपण जर आपल्या कामावर, ध्येयावर लक्ष केंद्रित केले तर इतरांचे दोष, अडचणी दिसत नाही आणि स्वतःची अकार्यक्षमतासुद्धा मिटविता येते.
राजूला या प्रसंगातून बोध मिळाला आणि त्याने राजीनाम्याचा विचार सोडून नव्या उमेदीने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. कोणतेही काम करताना किंवा ध्येय साकारताना अपेक्षित यश प्राप्त करण्यासाठी “फोकस’ खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी, समस्या,आव्हाने, इतरांचे दोष, प्रतिकूल परिस्थिती याचा अधिक विचार न करता त्यावर मात करून केवळ ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास यश हे मिळतेच.
सागर ननावरे