कुआलालांपूर, (मलेशिया) – मलेशियामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आलेल्या पूरामुळे तब्बल 22 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे.
मलेशियामध्ये दर वर्षाच्या अखेरीस पावसामुळे पूरस्थिती निर्माण होत असते. यावर्षी देखील शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यापूरामुळे कुआलालांपूरसह अन्य काही शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मलेशियातील 8 प्रांतातील एकंदर 22 हजांरांपेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. यापैकी 10 हजार नागरिक एकट्या पेहांग या मध्य प्रांतातील रहिवासी आहेत. मलेशियातील श्रीमंत शहर म्हणून नावाजलेल्या सेलांग शहरातील 5 हजार नागरिकांनाही दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला आहे. पंतप्रधान इस्माईल साबरी याकूब यांनी या प्रचंड पूराबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. मलेशियामध्ये सध्या उन्हाळा सुरू आहे.
या ऋतूमध्येही मलेशियामध्ये इतका मोठा पाऊस पडला आहे आणि एरवी सेलांगोरला पूर येत नसतानाही तेथे एवढा पूर आला आहे, याबद्दल पंतप्रधान इस्माईल साबरी याकूब यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रविवारी सकाळी देशातील पाच प्रांतांमध्ये पूरस्थिती असल्याचे सरकारी वेबसाईटवर म्हटले होते.
राजधानी कुआलालांपूरलादेखील पूराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.
मलेशियामध्ये 2014 साली पडलेल्या पावसामुळे 2 लाख 14 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला होता.