नवी दिल्ली – देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये 2018 पासून चार वर्षांत रॅगिंग घडल्याच्या 2 हजार 790 तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्याप्रकरणी सुमारे 1 हजार 300 विद्यार्थ्यांवर विविध प्रकारची कारवाई करण्यात आली.
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी संबंधित माहिती लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली. त्यासाठी त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (युजीसी) उपलब्ध असलेल्या आकडेवारीचा आधार घेतला. इतरांवर रॅगिंग करणाऱ्या 620 विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. त्याशिवाय, 616 जणांना तंबी देण्यात आली.
तर, 17 विद्यार्थ्यांची तात्पुरती हकालपट्टी करण्यात आली. रॅगिंग बंदी आणि परिणामांबाबत केंद्र सरकारने याआधीच आदेश जारी केले आहेत. ते आदेश शिक्षण संस्थांच्या माहितीपत्रकांमध्ये नमूद करणे युजीसीने अनिवार्य केले आहे.
देश पातळीवर रॅगिंगविरोधी हेल्पलाईन उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच वेबसाईटही विकसित करण्यात आली आहे. त्या माध्यमातून तक्रारी आणि त्यावरील कारवाईचा तपशील नोंदवला जात आहे. रॅगिंगविरोधात प्रभावी पाऊले उचलण्यासाठी युजीसीने समितीही स्थापन केली आहे.