- केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पूरस्थिती गंभीर
- आतापर्यंत 164 बळी; लाखो पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
तिरुवनंतपुरम: देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये सध्या पूर आणि अतिवृष्टीचे थैमान सुरू आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमधील पूरस्थिती गंभीर बनली आहे. केरळमध्ये 67 तर अन्य तीन राज्यांमध्ये मिळून 97 जण आतापर्यंत मृत्यूमुखी पडले आहेत.
कर्नाटकातील बहुतेक सर्व नद्यांना पूर आला आहे. तुंगभद्रा नदीमध्ये 1.70 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग असल्याने “युनेस्को’ने जागतिक वारसा जाहीर केलेल्या हंपीला पाण्याचा वेढा पडला आहे. हंपीतील पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू अस्लेल्या संततधार पावसामुळे कर्नाटकात 31 जण मरण पावले तर 4 लाख लोकांना 17 जिल्ह्यांमधील 80 तालुक्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कर्नाटक आणि महाराष्ट्रामधील पूरग्रस्त भागांची हवाई पहाणी केली. केरळमध्ये 2.27 लाख लोकांनी 1,551 छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला असून 8 ऑगस्टपासून आतापर्यंत 67 जण मरण पावले आहेत. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बंद असलेली विमान वाहतुक रविवारी दुपारपासून पुन्हा सुरू झाली. कन्नूर, कासारगोड आणि वायनाडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
वडकारा, कोदुंगाल्लूर आणि पेरिनथालामान्ना येथे आजही जोरदार पाऊस झाला. केरळमधील सर्वच धरणे भरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वायनाडमधील पुथुमालामध्ये गुरुवारी भूस्खलन झाल्याने 8 जण बेपत्ता झाले असून शोधमोहिम सुरू आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कर, नौदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, स्थानिक पोलिस, स्वयंसेवी कार्यकर्ते आणि मच्छिमारांचे प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तुंगभद्रा धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आल्याने बेळ्ळारी जिल्हा प्रशासनाने नदीच्या दोन्ही काठांवर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
दक्षिण रेल्वेने रविवारी मंगळूरु-तिरुवनंतपुरम एक्सप्रेस, मावेली एक्सप्रेस, मलबार एक्सप्रेस, कन्नूर एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेस आणि एर्नाकुलम-बेंगळूरू इंटरसिटी एक्सप्रेससह 10 रेल्वे गाड्या रद्द केल्या. कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळमध्ये मदत साहित्य घेऊन जाण्यास रेल्वेने माल वाहतुक शुल्कात सवलत दिली आहे.
महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील 4 लाख नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. 69 तालुक्यांमधील 761 गावांना पूराचा फटका बसला आहे. आतापर्यंत 35 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात सांगलीतील ब्रह्मनाळ गावाजवळ बोट बुडून मरण पावलेल्यांचाही समावेश आहे. या दुर्घटनेतील 5 जणांचे मृतदेह आज सापडले. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 17 झाली आहे.
महाराष्ट्रातील पूरस्थिती आटोक्यात येण्यासाठी कृष्णा नदीवरील कर्नाटकातील आलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून 53 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पूराचा फटका बसला आहे. “एनडीआरएफ’ची 29, “एसडीआरएफ’ची 3, तटरक्षक दलची 16, नौदलाची 41 आणि लष्कराची 10 पथके या 10 जिल्ह्यांमध्ये तैनात आहेत.
गुजरातमधील अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे. सौराष्ट्रातच 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अरबी समुद्रामध्ये तीन बोटी बुडाल्याने पोरबंदरच्या किनाऱ्याजवळ 5 मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाला. कच्छ आणि सौराष्ट्रात अजूनही संततधार पाऊस सुरू आहे. सुरेंद्रनगरजवळील वावडी गावातील पूर आलेली फालकू नदी ओलांडायचा प्रयत्न करणारे 7 जण वाहून गेले. त्यापैकी 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत. शनिवारपासून नखात्राणा, तांकारा, धरांगाधा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.