नवी दिल्ली – सध्या देशभरातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने पुन्हा दिला आहे. तर दिल्ली सारख्या राज्यनामध्ये पुन्हा पुराच्या भीतीने लोक धास्तावले आहेत.
दिल्लीत पुन्हा पुराचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकदा दिल्लीच्या रस्ते वाहतुकीमध्ये बदल होताना देखील पाहायला मिळाला होता. अशात आता राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. हरियाणात झालेल्या पावसानंतर हातिनीकुंड बॅरेजच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागात गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे हथिनीकुंड बॅरेजमधील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. मुसळधार पावसामुळे, हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील हथिनीकुंड बॅरेजमधील पाण्याचा प्रवाह शनिवारी सकाळी 8 वाजता 87,177 क्युसेकवरून दुपारी 12 वाजता 2,40,832 क्युसेक इतका वाढला.
आग्रा येथे ऐतिहासिक पाणी पातळी
गेल्या ४५ वर्षांमध्ये आता यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच पावसाचे पाणी ताजमहालाच्या भिंतींपर्यंत येऊन पोहचले आहे. यामुळे ताजच्या आसपासचे घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच पाण्याचा धोका लक्षात घेऊन या भागातील काही नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात आले आहे.