नवी दिल्ली – बिहारमधील बेतियामध्ये पुराचा कहर सुरूच आहे. 15 गावांतील आठशे घरांमध्ये पाणी शिरले आहे. यासोबतच अनेक रस्ते देखील पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे स्थानिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नेपाळमधील तराई भागात आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे डोंगराळ नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे नरकटियागंज उपविभागातील गौनाहा, लॉरिया, नरकटियागंज, सिक्टा, मनातांड आदी ब्लॉकमधील सुमारे आठशे घरांमध्ये पाणी शिरले. यानंतर लोकांनी सुरक्षित ठिकाणांचा शोध सुरू केला आहे. मात्र, रविवारी सायंकाळपासून या भागांतून पाणी ओसरू लागले असले तरी पूर्णपणे दळणवळण सुरु झाले नाही.
गौनाहा गटात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरी नद्यांना पूर आला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी गावांमध्ये शिरले आहे. त्यामुळे 550 हून अधिक घरे बाधित झाली असून, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कटहां नदीच्या तारा बसवारिया गावाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेला मार्गदर्शक बंधारा तुटला आहे. त्यामुळे सुमारे दीडशे घरांमध्ये पुराचे पाणी शिरले.
तारा बसवरिया उन्नत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्र मोहन प्रसाद व सहाय्यक शिक्षक सीताराम दिसा यांनी सांगितले की, बांध फुटल्याने शाळेत साडेतीन फूट पाणी शिरले आहे. यामुळे डाळ, भाजीपाला, मसाला व इतर साहित्यासह तांदळाची सहा पोती खराब झाली आहेत.