संतोष पवार
सातारा – जिल्ह्यात 82 हजार 793 दिव्यांग असल्याची माहिती सर्वेक्षणातून स्पष्ट झाली आहे. जिल्ह्यातील पाच लाख 68 हजार घरांमध्ये जाऊन 2 हजार 625 सर्वेक्षकांनी हे सर्वेक्षण केले आहे. आता दिव्यांग आढळलेल्यांची तपासणी करुन त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला.
दिव्यांगाचा घरोघरी जाऊन सर्व्हे करुन त्यांची गावातच तपासणी करुन पात्र दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी दिव्यांगांच्या सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक दिव्यांग व्यक्तींकडे प्रमाणपत्रे नसल्याने शासकीय योजनांपासून त्यांना वंचित राहवे लागते. यासाठी सर्वेक्षण करुन गावातच त्यांना नियमानुसार प्रमाणपत्रे देण्याचा उपक्रम राबवण्याचा निर्णय तत्कालिन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी घेतला होता.
या निर्णयामुळे दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्रे देताना पारदर्शकता राहणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे. रुचेश जयवंशी यांच्या बदलीनंतर जितेंद्र डुडी आणि ज्ञानेश्वर खिलारी यांनी याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन कार्यवाही सुरु ठेवली. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने एजन्सी नेमून सर्वेक्षणाचे काम सुरु झाले. अकरा तालुक्यातील 79 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 419 उपकेंद्रे व एक हजार 704 गावांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये 82 हजार 793 व्यक्ती दिव्यांग आढळल्या. अपंग प्रमाणपत्रासाठी (युआयडी) 73 हजार 686 दिव्यांगांनी अर्ज केला नसून सध्या 5 हजार 430 दिव्यांगांकडे अपंग प्रमाणपत्रे आहेत. 3 हजार 877 जणांनी अर्ज केला.
पण प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे या सर्व्हेतून पुढे आले आहे. दिव्यांगांचा सर्व्हे झाल्याने आता त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. ज्यांच्याकडे घरे नाही त्यांना घरांची सुविधा, साक्षर पात्र दिव्यांगांना नोकरीची संधी, दारिद्रय रेषेखालील लोकांना रेशनकार्ड, शेतजमीन असणाऱ्यांना योजना व कर्ज, कर सवलत आणि लाभ मिळवण्यासाठी योजना असे फायदे आता दिव्यांगांना मिळणार आहेत. याचबरोबर संजय गांधी पेन्शन योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजनेचाही लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात 67 हजार 455 दिव्यांग मतदार असून 8 हजार 55 दिव्यांगांकडे मतदार ओळखपत्रे नाहीत.
5 हजार 800 दिव्यांगांकडे आधारकार्ड नाहीत, 14 हजार 801 दिव्यांगांची बॅंक खाती नाहीत, 68 हजार 67 दिव्यांगांकडे कोणत्याही प्रकारचा विमा नाही, 904 दिव्यांगांनी न्यायालयात खटले दाखल केले आहेत. 3 हजार 888 दिव्यांगांनी दिव्यांगत्वामुळे अपमानास्पद वागणुकीची तक्रार केल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. जिल्ह्यात 11 हजार 639 अविवाहित दिव्यांग असून 1 हजार 59 एकल आहेत. 439 घटस्फोटित असून 158 परितक्त्या महिला आहेत. 10 हजार 844 दिव्यांग विधवा असून 322 विभक्त आहेत. 49 हजार 426 विवाहित आहेत. या दिव्यांगांपैकी 45 हजार 803 पुरुष, 36 हजार 978 महिला तर 12 दिव्यांग तृतीयपंथी आहेत. एक वर्षापेक्षा कमी वयाचे 333, एक ते सहा वयाचे 1 हजार 222, 7 ते 15 वयोगटातील 4 हजार 418, 16 ते 25 वयोगटातील 6 हजार 57, 26 ते 60 वयोगटातील 38 हजार 476 तर 61 वर्षावरील 32 हजार 287 दिव्यांग आहेत.
जावळी तालुक्यात 4 हजार 198, कराड तालुक्यात 12 हजार 294, खंडाळा तालुक्यात 4 हजार 19, खटाव तालुक्यात 9 हजार 446, कोरेगाव तालुक्यात 6 हजार 631, महाबळेश्वर तालुक्यात 1 हजार 60, माण तालुक्यात 8 हजार 491, पाटण तालुक्यात 7 हजार 647, फलटण तालुक्यात 8 हजार 837, सातारा तालुक्यात 14 हजार 887, वाई तालुक्यात 5 हजार 283 दिव्यांग असल्याचे सर्व्हेतून पुढे आले आहे.
दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता प्रत्येक गावात दिव्यांगांचा सर्व्हे झाला असून त्यांची तपासणी करुन जागीच प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे पात्र दिव्यांगांना जलद प्रमाणपत्र मिळून गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी
या कारणामुळे आलेले दिव्यांगत्व
अनुवंशिक (वंशपरंपरागत)…………2,667
अपघात…………………………11,848
आजाराने……………………….20,682
जन्मजात………………………..25,098
वयोमानानुसार…………………..22,498
अशी आहे दिव्यांगांची सद्य परिस्थिती
विशेष शाळा………………………….263
घरी…………………………..82 हजार 40
वृध्दाश्रम……………………………….16
स्थलांतरित……………………………..82
होस्टेल…………………………………53
इतर, रस्ता, मंदिरे………………………339
एक दिव्यांग असलेली घरे………66, 657
तीन दिव्यांग असलेली घरे…………..755
चार दिव्यांग असलेली घरे…………….88
पाच दिव्यांग असलेली घरे…………….15
सहा दिव्यांग असलेली घरे……………..4