लखनौ – विहिरीत पडलेल्या वासराला वाचविण्यासाठी उतरलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला असून वासरू मात्र, जिवंत राहिल्याची घटना येथील गोंडा गावात घडली.गावातील एका कोरड्या विहिरीत एक वासरू घसरून पडले होते. त्याच्या हंबरण्याच्या आवाजाने काही लोक विहिरीजवळ जमले. त्यातील पाच जणांनी विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला.
विहिरीतून आचानक विषारी वायूचे उत्सर्जन झाल्याने या पाचही जणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. मात्र, वासराला वाचविण्यात अन्य लोकांना यश आले. मृत्यू झालेल्या या पाचही व्यक्तींपैकी चार जण एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. हे वासरू या पाच जणांपैकी एकाचेही नव्हते तरी त्यांनी दया दाखवून त्याचे प्राण वाचवण्यासाठी विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला होता.
हे पाचही जण भाजीपाला तसेच फळे विकून गुजराण करतात. हे ज्या ठिकाणी मालाची विक्री करतात त्या जवळच ही विहीर आहे. बुधवारी अचानक या विहिरीतून हंबरण्याचा आवाज आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले व त्याना वासरू पडल्याचे लक्षात आले.