परीक्षेच्या निकालाच्या दिवशी एखाद्या विद्यार्थ्याच्या मनावर ज्याप्रमाणे दडपण येते, त्यासारखे दडपण स्टार मंडळींना चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी येते. पेपर कितीही चांगला लिहला तरी गुण किती मिळतात, याचा ताण विद्यार्थ्याला असतो. कलाकारांना देखील स्वत: कितीही चांगले काम केले तरी मायबाप प्रेक्षक स्वीकारतात की नाही, यश मिळते की नाही, याची काळजी असते.
कारण यावरच पुढचे करियर अवलंबून असते. त्यामुळे प्रदर्शनाचा दिवस हा कलाकारांची सत्त्वपरीक्षा पाहणारा असतो. अशा स्थितीत मानसिक तणाव दूर करण्यासाठी ते काय करतात, हे जाणून घेणे खूप औत्सुक्याचे ठरेल.
शाहरुख खान – चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी मी खूपच तणावाखाली वावरत असतो. करियरच्या प्रारंभापासून ते आजतागायत या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. हा ताण इतका वाढत जातो की मला शांत झोपही लागत नाही. जेवणातही लक्ष लागत नाही.
अशावेळी चित्रपट प्रदर्शनाच्या पत्रकार परिषदेत सहभागी होतो. यातून मी पत्रकारांचे मत जाणून घेतो. पत्रकारांना चित्रपट पसंत पडल्यास श्रोत्यांनाही तो चित्रपट आवडतो, असे माझे मत आहे. म्हणूनच स्वत:ला तणावमुक्त ठेवण्यासाठी मी पत्रकार परिषदेत सामील होतो.
शाहिद कपूर – मी अभिनया-वरून खूपच संवेदनशील आहे. एखादा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होणार असतो, तेव्हा माझी स्थिती ढासळते. तणावामुळे मी कोणाशीही बोलू शकत नाही. आर. राजकुमारचे प्रदर्शन झाले तेव्हा मी अनेककाळ स्वत:ला कोंडून घेतले होते.
यादरम्यान मला सोनाक्षी सिन्हाचा फोन आला. ती म्हणाली, एवढे काय टेन्शन घेतलेस. चित्रपट चांगला चालत आहे. चित्रपट हिट झाला आहे. तिच्या बोलण्याने मला हायसे वाटले. अशीच अवस्था माझी प्रत्येक चित्रपटाच्या वेळी होते.
आलिया भट्ट – चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी मी खूपच अस्वस्थ असते. ज्या दिवशी सिनेमा रिलीज होतो तेव्हा माझी स्थिती फारच बिघडते. माझा रक्तदाब खाली-वर होतो. अर्थात आतापर्यंत माझा एकही चित्रपट आपटला नाही. मात्र प्रत्येक चित्रपटाच्या वेळी माझ्या डोक्यात अपयशाचेच विचार येतात. अलीकडेच “गली बॉय’ जेव्हा रिलीज झाला तेव्हा मी टॉकिजवर गेले होते.
लोकांचे म्हणणे ऐकूून घेण्यासाठी मी तेथे पोचले. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मला आनंद वाटला. अनेकदा तर तणावामुळे मी मुंबईबाहेर पळते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मी मुंबईला परत येते.
श्रद्धा कपूर – जेव्हा माझा एखादा चित्रपट रिलीज होतो तेव्हा माझ्या पोटात गडबड होते. मी इतकी तणावाखाली राहते की दिवसभर अस्वस्थ राहते. माझी स्थिती पाहून घरातले लोक माझ्यावर हसतात. खरे सांगायचे झाल्यास पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी मला फारसा ताण झाला नव्हता. कारण करियरवरून मी फारशी गंभीर नव्हते. मी हौसेखातर अभिनय करत होते.
मात्र अभिनय हाच पुढे माझा करियरचा घटक बनला. त्यामुळे आता अभिनयावरून मी इतकी गंभीर बनले की, रिलीजच्या दिवशी मी बेचैन राहते. “स्त्री’ प्रदर्शनाच्या दिवशी मी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी टॉकिजमध्ये पोचले होते. चित्रपट पाहिल्यानंतर जेव्हा श्रोते खूष झाले तेव्हा माझ्या अंगावर मूठभर मांस वाढले. माझ्या मेहनतीला मिळालेले यश पाहून मी आनंदी झाले.