जम्मू: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेत (एलओसी) शेजारी असलेल्या चौक्या व खेड्यांवर पाकिस्तानी सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी रविवारी युद्धबंदीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या लष्कराने गोळीबार व हलक्या शस्त्रांचा मारा केला, असे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले. सायंकाळी 5.15 च्या सुमारास सीमेच्या शहापूर आणि र्केणी सेक्टरमध्ये पलीकडून झालेल्या चिथावणीखोर गोळीबार सुरू झाला आणि भारतीय सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
या युद्धबंदीच्या उल्लंघनात भारतीय बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले. शेवटचे वृत्त मिळेपर्यंत गोळीबार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील 2 हजारपेक्षा जास्त वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे 21 भारतीयांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाले आहेत. नियंत्रण रेष आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखण्यासाठी दोन्ही देशांमधील 2003 च्या युद्धबंदी कराराचे पालन करण्याचे आवाहन भारताने पाकिस्तानला वारंवार केले आहे.